Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महा जनादेशयात्रा : साताऱ्यात मुख्यमंत्र्यांनी पाडला आश्वासनांचा पाऊस

Spread the love

महाजानदेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीसह मेडिकल कॉलेजचे याच वर्षी प्रवेश, साताऱ्यातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पन्नास कोटी व उरमोडीच्या उर्वरीत कालव्यांचे भूमीपूजन अशा घोषणांचा  पाऊस पाडला. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीत उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांचा सन्मान कमी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणात महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत दिली. छत्रपती शिवरायांच्या नावाखाली महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने छत्रपतींच्या वंशजांना काय दिले? छत्रपतींचे घराणे घेणारे नाही तर  देणारे आहे असेही ते म्हणाले.


सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणावर सायंकाळी सव्वासहा वाजता यात्रेचे आगमन झाले. त्यानंतर जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘छत्रपतींचे वंशज आज आमच्यासमवेत आमच्या पक्षात एकाच मंचावर आहेत यापेक्षा वेगळा सुदीन कोणता. महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात भरभरून स्वागत झाले त्यासाठी मी सातारकरांचे मनापासून आभार मानतो. उदयनराजे यांनी मला पगडी दिली शिवेंद्रराजे यांनी तलवार दिली. त्यामुळे मी आता छत्रपतींचा मावळा आहे. छत्रपतींनी मागण्या नाही तर आदेश करायचा असतो. फाइल पूर्ण असेल तर सातारा शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर मी उद्याच सही करतो. गिरिश महाजन यांची तयारी असेल तर याच वर्षी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.’

सातारा शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पन्नास कोटी रुपये व उरमोडी धरणाच्या कालव्यांच्या कामांच्या भूमीपूजनाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दोन्ही राजांनी भाजपामध्ये विनाअट प्रवेश केला. त्यांच्या अटी या जनतेच्या विकास कामासाठी होत्या. अटींचे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीने दोन्ही राजांना काय दिले? जनतेच्या विकास कामांसाठी त्यांची धडपड आहे. छत्रपतीचे वंशज पक्षात आल्याने पक्षाची बळकटी वाढली आहे. महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता महाराष्ट्राचा निकाल काय असणार आहे, हे वेगळे सांगायला नको. गेल्या पाच वर्षांच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आम्ही जनतेशी संवाद साधतोय. विरोधी पक्षाकडे तेल लावलेला पैलवानच उरलेला नाही. पुन्हा समृद्ध महाराष्ट्रासाठी राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे, असे नमूद करत सातारा जिल्हा पूर्णपणे बेघरमुक्त करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

छत्रपतींच्या वंशजांच्या कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रवादीला आता महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे, अशी टीका फडणवीस यांनी करत उदयनराजे व शिवेंद्रराजे यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उदयनराजे भोसले , शिवेंद्रराजे भोसले, खासदार संजय काकडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर, कांताताई नलावडे, आमदार बाळासाहेब भेगडे, नगराध्यक्ष माधवी कदम, डॉ. दिलीप येळगावकर, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार उपस्थित होते .

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, राष्ट्रवादीत असताना आमच्या कामाच्या फायली थेट कचऱ्याच्या डब्यात जात होत्या. असे एक नाही अनेकवेळा झाले. कोणतेही काम वेळेत पूर्ण झाले नाही. आघाडी सरकारने अनेक प्रकल्प रखडवून ठेवले. मात्र, हजारो कोटींची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहेत. मला राष्ट्रवादीने काही दिले नसले तरी किमान सहनशीलतेचा एखादा पुरस्कार तरी द्यायला हवा होता, अशीही कोपरखळी राजेंनी लगावली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!