संजय निरुपम आणि मिलिंद देवरांमध्ये धुसफूस चालूच
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर आता अन्य नेतेही राजीनामा देताहेत. मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मुंबई काँग्रेसचं कामकाज चालविण्यासाठी तीन सदस्यांची नियुक्ती करावी असं सूचवलं होतं. मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी देवरांच्या सूचनेला विरोध केलाय. एका प्रदेशाध्यक्षाऐवजी तीन सदस्यांची नियुक्ती करणं योग्य नसल्याचं निरुपम यांनी म्हटलंय.
निरुपम आणि देवरा यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे. निरुपम हे एकाधिकारशाही करतात असा आरोप करत मुंबईतल्या अनेक नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर वाद शमविण्यासाठी मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही मुंबई काँग्रेसमधला वाद सुरुच असल्याचं स्पष्ट झालंय.
मिलिंद देवरांचा राजीनामा
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.