भाजप सरकारमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची इभ्रत आणि विश्वासार्हता कमी झाली : प्रकाश आंबेडकर
केंद्रातील भाजपप्रणीत सरकारवरील लोकांचा विश्वास झपाटय़ाने कमी होत असून देशाची इभ्रतही धोक्यात आली आहे. ती वाचवायची असेल तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हटवा, असे स्पष्ट आवाहन बहुजन महासंघाचे नेते प्रकाशआंबेडकर यांनी शुक्रवारी केले. वंचित बहुजन आघाडीतर्फे रत्नागिरी येथील चंपक मदानात आयोजित महामेळाव्यात भाजप-सेना युतीवर जोरदार टीका करताना आंबेडकर म्हणाले की, या सरकारने पुलवामा प्रकरणानंतर पाकिस्तानात घुसून केलेल्या हल्ल्याचा नेमका काय परिणाम झाला, हे आजही कुणी सांगू शकत नाही. उलट, भाजपचे नेते वेगवेगळे दावे करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची इभ्रत आणि विश्वासार्हता कमी झाली आहे. ती पुन्हा मिळवायची असेल तर भाजपला सत्तेतून हटवा. मात्र तसे करताना जातीच्या आधारे मतदान करू नका, लढणाऱ्या माणसाला निवडून द्या, असेही आंबेडकर यांनी बजावले.
बॅ. नाथ प, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू इत्यादी नेत्यांनी कोकणच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले; पण नारायण राणे मुख्यमंत्री होणे हे दुर्दैव आहे. काँग्रेस किंवा भाजप सरकारने त्या दिशेने काहीही केले नाही, असा आरोप करून आंबेडकर म्हणाले की, येथील सर्व प्रस्थापित पक्ष खोतांच्या बाजूने आहेत. त्यामुळेच इतकी वर्षे झाली तरी बेदखल कुळांचा प्रश्न कायम राहिला आहे. सुंदर निसर्ग आणि हवामान लाभलेल्या या प्रदेशात प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत. या सर्व घडामोडींकडे आपण सावधगिरीने बघितले पाहिजे आणि त्यांना विरोध केला पाहिजे.