भाजपाची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची भाकरी आता करपली ती भाकरी फेकून द्या : प्रकाश आंबेडकर
भाजपाची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची भाकरी आता करपली असून ती भाकरी फेकून देण्याची गरज आहे. आम्हाला वंचितांच्या कल्याणासाठी आणि हक्कांसाठी सत्ता पाहिजे असा निर्धार करून आम्हाला यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचा गौरवपूर्ण महाराष्ट्र उभा करायचा आहे असे उदगार वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या बारामतीत बोलताना काढले.
आजच्या या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, काँग्रेस पैसे खाताना दिसत होती पण मोदी सरकारचा भ्रष्टाचार हा कार्पोरेट भ्रष्टाचार असून ते आधी कार्पोरेट क्षेत्रांना खाऊ घालतात आणि मग त्यांच्याकडून ९० टक्के हिस्सा परत घेतात असा हा फरक आहे. आपल्या भाषणात त्यांनी मोदी यांच्या धोरणावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. आजच्या फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मतदारांनी आज विचार करण्याची गरज आहे कि, तुम्ही मदत कुणाला करणार आहात ?संघाला करणार आहात कि, संविधान वाद्यांना करणार आहेत. महात्मा फुलेंनी केलेली क्रांती त्यांना गाडायची आहे. ते सांगतात, धर्म संकटात आहे. कुणाचा धर्म संकटात आहे ? तुमच्या कोणत्या यात्रेला ते आले ? मनुवादाला मदत करणारांची संख्या आज वाढतेय कारण आपल्या धर्मभोळे पणाचा फायदा ते घेत आहेत आणि तुम्हाला ते कळत नाही. धर्म प्रेम फक्त सत्तेसाठी आहे हे लक्षात घ्या. आज जो वाद चालला आहे तो केवळ नावापुरता आहे हेलक्षात घ्या.
शरद पवार यांच्यावर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले , (बारामती) याच शहरातले लोक मोदींच्या राजकारणाला पाठिंबा देतात कारण आपण केलेला भ्रष्टाचार उघड होईल आणि जेलमध्ये जावे लागेल अशी भीती त्यांना आहे म्हणून ते नीतिहीन राजकारण करतात. सहकारामुळे मस्तावलेल्या लोकांनी हे लक्षात घ्यावे कि आपले पोट भरले म्हणजे सर्वांचे पोट भरले असा त्याचा अर्थ होत नाही.म्हणून ज्यांनी सहकाराची चळवळ केली त्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचा गौरवपूर्ण महाराष्ट्र उभा करायचा आहे. असे बोलून त्यांनी बारामती मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या अनेक नेत्यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली.आजच्या सभेला एमआयएमचा कुणीही मोठा नेता उपस्थित नव्हता.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीबाबत आज ते काही बोलतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी यावर कुठलेही भाष्य केले नाही.त्यांना२८फेब्रुवारीरोजीकाँग्रेस-राष्ट्रवादीने लेखी पत्र देऊन पुन्हा एकदा महाआघाडीत येण्याची विनंती केली आहे परंतु त्यावर ते काही बोलले नाहीत.