Ramdas Athawale : आठवलेंना बोलू आणि नाराजीही दूर करू म्हणाले मुनगंटीवार : वर्षावर होतेय प्रीतिभोज !!
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीवर नाराज असलेले केंद्रीयमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी बोलून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असं राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. युतीच्या घोषणेनंतर वर्षा बंगल्यावर युतीच्या नेत्यांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जेवणातील पदार्थ तिखट आहेत, की गोड हे माहिती नाही. पण, शेवट नक्की गोड असणार, अशी सूचक टिपण्णी यावेळी मुनगंटीवार यांनी केली.
भाजप आणि शिवसेनेमध्ये लोकसभेसाठी जागावाटप झाले आहे. यात आठवलेंच्या पक्षासह अन्य कुठल्याच छोट्या मित्रपक्षाला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे रामदास आठवलेंनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, महायुती होईलच, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ज्या पक्षांनी भाजपला साथ दिली त्यांचा सन्मान करण्यात निश्चित करण्यात येईल. सर्व घटक पक्षांसह महायुती होईल. या युतीच्या जोरावर आम्ही विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड देऊ, असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पाबाबात माहिती देताना ते म्हणाले की, २७ फेब्रुवारीला सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प अंतरिम आहे. यामुळे जूनमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. जूनच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय देऊ. शेतीचा व्यवसाय हा मजबुरीचा नाही; मजबुतीचा व्यवसाय आहे, असे शेतकऱ्यांना वाटले पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले.