काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ४० जवान शहीद : देशभर संताप
महाराष्ट्राच्या सुपुत्रालाही वीरमरण
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान या हल्ल्यात जखमी झाले असून जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू काश्मीर सरकारचे सल्लागार के विजय कुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. शहीद जवानांचा आकडा 40 पर्यंत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतावर करण्यात आलेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी
पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या लक्ष्य केले. एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात 40 जवान शहीद झाले आहेत. तर इतर अनेक जवान जखमी झाले आहेत. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, असे वृत्त ग्रेटर काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे. हल्ल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.गुरुवारी पुलवामा येथील महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. या ताफ्यात जवळपास २५ बस होत्या. एकूण अडीच हजार जवानांचा हा ताफा होता, असे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. जम्मूवरुन श्रीनगरला हा ताफा जात होता.
महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान राहुल करांडे हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. राहुल करांडे हे विठुरायाची वाडी गावचे आहेत. सांगली जिल्ह्यावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. सीआरपीएफकडून शहीद जवानांबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सांगली जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.