MaharashtraNewsUpdate : राज्यातील लॉकडाऊनविषयी आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

मुंबई : राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राज्यातील २१ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १० टक्क्यांवर आहे. त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत ते तूर्त उठवले जाणार नाहीत. १ जूननंतरही हे निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचे एकमत झाले आहे, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ज्या जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी होत आहे त्या जिल्ह्यांत १ जूननंतर काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात येतील, असे यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रेड झोनमधील जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांना थोडासा दिलासा मिळणार हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. या जिल्ह्यांत नेमके कोणते निर्बंध उठवले जाणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. राज्यात सध्या १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू असून त्याआधी नवा आदेश जारी केला जाईल. येत्या काही दिवसांत नव्या आदेशासोबत गाइडलाइन्स जारी होतील, असेही टोपे यांनी नमूद केले.
दरम्यान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. २१ जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. त्यामुळे लॉकडाऊन सरसकट उठवता येणार नाही. रुग्णसंख्या वाढती असेल तर त्यासोबत बेड उपलब्धतेसह इतरही प्रश्न निर्माण होत असतात. त्यामुळे त्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. म्हणून लॉकडाऊन कायम ठेवून काही प्रमाणात शिथीलता देण्याचा विचार आहे. जिथे रुग्णसंख्या कमी होत आहे तिथे काही निर्बंध शिथील केले जातील. सध्या जे निर्बंध लागू आहेत त्यात वेळेच्या बाबतीत तसेच अन्य बाबतीत काही सवलती देता येतील का यावर विचारविनिमय करून निर्णय होईल. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे टोपे यांनी नमूद केले.