पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात दिड लाख लोकांचे आगमन

मुळातच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत असताना, आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाहेरून एक लाख ४८ हजार नागरिक आले असल्याने बाधितांच्या सख्येत वाढ झाली आहे. दरम्यान ग्रामीण परिसरात असलेल्या २०३ करोनाबाधितांपैकी १६८ जण हे बाहेरून आलेले असल्याने ग्रामीण भागावर यापुढे लक्ष दिले जाणार आहे’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सहभागी झाले होते. ‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चिंतेची बाब आहे. गेल्या दहा ते १५ दिवसांत एक लाख ४८ हजार नागरिक हे बाहेरून आले आहेत. त्यामध्ये मुंबईतून नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत. ग्रामीण भागात २०३ करोनाबाधित असून, त्यापैकी १६८ जण हे बाहेरून आलेले आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन करणे, त्यांची वैद्यकीय चाचणी करणे ही कामे करण्यात येत आहेत’, असं जिल्हाधिकारी राम यांनी सांगितलं. ‘प्रशासनाचे अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी हे बाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, काही नागरिक हे या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले नाहीत, तर नागरिकांनी ही बाब लक्षात आणून दिली पाहिजे.’ असं ते म्हणाले.
‘ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालये या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. आता गंभीर स्थितीत असलेल्या करोनाबाधित रुग्णांवर या भागातील रुग्णांलयांमध्ये उपचार व्हावेत, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवारी सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापकांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली. ‘ग्रामीण भागात सुमारे सहा हजार कर्मचारी हे सर्वेक्षण करण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडे मतदार यादी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांची माहिती मिळत आहे’ असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.