कलम ३७० आणि सीएएवरून माघार नाही , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती

देशात ठिकठिकाणी सुरु असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कलम ३७० आणि सीएएवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. कोणत्याही परिस्थितीत सरकार निर्णय मागे घेणार नाही, असे मोदींनी ठामपणे सांगितले आहे. कलम ३७० आणि सीसीए हे आवश्यक होतं. सरकारवर प्रचंड दबाव असतानाही हे निर्णय घेण्यात आले. यामुळे हे निर्णय कायम राहतील, अशी ग्वाही मोदींनी वाराणसीतील जाहीर सभेत दिली.
दिल्लीतील शाहीनबागमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात मुस्लिम महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे आंदोलन करण्यात येत आहे. तसंच मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणी सीएएविरोधात मोर्चे आणि आंदोलनं करून सरकारवर दबाव वाढवण्यात येत आहे. तसंच अनेक राज्यांनी सीएए लागू करणार नसल्याची भूमिका घेतलीय. विरोधकांनीही सीएएवरून सत्ताधारी भाजपला टीकेचं लक्ष्य केलंय. या पार्श्वभूमीवर वाराणसीतील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. राम मंदिराचे प्रकरण काही दशकांपासून न्यायप्रविष्ठ होतं. आता मंदिर निर्माणाचा रस्ता मोकळा झाला आहे. सरकारने मंदिर निर्माणासाठी ट्रस्टचीही घोषणा केलीय. यामुळे लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होईल, असं मोदी म्हणाले.
यावेळी बोलताना मोदी पुढे म्हणाले कि , कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर महाकालच्या आशीर्वादाने निर्णय घेण्यास आपण सक्षम झालो. कलम ३७० असो की सीएए मोठा दबाव येऊनही सरकारने हे निर्णय घेतले. महाकालच्या आर्शीवादाने घेतलेले हे निर्णय यापुढेही कायम राहतील याची ग्वाही देतो. देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सरकार मागे हटणार नाही, अशीच भूमिका याआधी मांडलीय.