लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी पंतप्रधान होतील – प्रियंका गांधी यांना विश्वास

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल व राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास प्रियंका गांधींनी व्यक्त केला आहे. पुढच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसचे सरकार आणण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी माझ्यावर सोपवली आहे असे त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.
तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रियंका गांधी अमेठी आणि रायबरेलीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. अमेठी हा राहुल गांधी तर रायबरेली सोनिया गांधी यांचा मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधींवर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवायलाही तयार आहे असे प्रियंका गांधींनी सांगितले. मला काँग्रेसने निवडणूक लढवायला सांगितली तर मी नक्कीच निवडणूक लढेन असे प्रियंका म्हणाल्या. प्रियंका गांधी यांच्या अमेठी दौऱ्यापूर्वी त्यांच्यावर टीका करणारे पोस्टर अमेठीत जागोजागी लागले आहेत. ‘क्या खूब ठगती हो, क्यों पाच साल बाद ही, अमेठी दिखती हो’ या अशा स्वरूपाच्या ओळी असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत.