MaharashtraPoliticalUpdate : ग्राम पंचायत निवडणूक , आयोगाचा मोठा निर्णय …
मुंबई : राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे राज्यातील या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे सुमारे ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणेकरीता आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात येत आहे. दरम्यान ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस जश्या संपतील, तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत.
दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला लिहिलेल्या पत्रात कोविड- १९ आजाराबाबत शासनाने लागू केलेले निर्बंध तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध रिट याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका टप्या-टप्याने घेण्यात आल्या आहेत. आता राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६४९ तसेच नवनिर्मित ८ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे. त्याचे वेळापत्रक सर्व तयारी झाल्यानंतर घेतल्या जाणार आहेत.