Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraAccidentNewsUpdate : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री अपघातात ठार …

Spread the love

मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे.


एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कार रविवारी महाराष्ट्रातील पालघरमध्ये दुभाजकाला धडकली. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात होते. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. हा अपघात असल्यासारखे वाटते.” शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी 54 वर्षीय सायरस मिस्त्री यांच्या निधनावर ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

सायरस मिस्त्री यांच्या या अपघाती मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची सखोल चौकशी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची पोलीस यंत्रणेकडून तत्परतेने अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सायरस मिस्त्री यांचा मृतदेह मुंबईत आणला जाणार आहे आणि  शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह रुग्णालयातून त्यांच्या गुजरातमधील घरी नेण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

प्राथमिक माहितीनुसार सायरस मिस्त्री आपल्या  तीन सहकाऱ्यांसोबत  गुजरातहून मुंबईकडे येत होते. दरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येत असताना त्यांच्या कारला पालघरजवळ कारला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार नदीच्या पुलाला जाऊन धडकली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. मिस्त्री यांच्यासोबत असलेल्या पंडोले नामक व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे, तर इतर दोन सहकारी जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मिस्त्री यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आदरांजली वाहिली जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भावुक प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते,’ असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!