ShivsenaNewsUpdate : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयावर बोलले उद्धव ठाकरे…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या शिवसेनेच्या याचिकांचा निकाल लावण्यासाठी घटनापीठाची स्थापना तातडीने करण्यात येणार असून, या याचिकांवर गुरुवारी सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केले. या निर्णयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर आपले मत मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , “मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. दोन गोष्टी मी याबाबतीत सांगू इच्छितो. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते कारण तिच्यासाठी सगळे सारखे असतात. मात्र त्यावेळेस जनता सर्व उघड्या डोळ्यांनी बघत असते. न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे आधारस्तंभ आपल्या देशात मजबूत आहेत. तोपर्यंत या देशामध्ये लोकशाहीच राहील. बेबंदशाही येऊ देणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या प्रकरणात घटनेच्या परिशिष्ट १० अंतर्गत अपात्रता, विधानसभा अध्यक्ष, राज्यपालांचे अधिकार आदींबाबत घटनात्मक मुद्दे उपस्थित होत असल्याने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात येत असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी नमूद केले.