Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : उपराष्ट्रपतीपदासाठी चालू आहे मतदान , धनखड आणि अल्वा यांच्यात लढत …

Spread the love

नवी दिल्ली : देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी शनिवारी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. आकडेवारीचा विचार करता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांचा विजय निश्चित दिसत आहे.


दरम्यान  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने अल्वा यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी एकमत न होण्याच्या प्रयत्नांचा हवाला देत मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केल्याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.

अल्वा यांना पाठिंबा कुणाचा ?

एनडीए च्या विरोधातील युपीएच्या ऐंशी वर्षीय अल्वा या  काँग्रेसच्या  ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), आम आदमी पार्टी (AAP) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांनी अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेही अल्वा यांना पाठिंबा दिला आहे.

धनखड यांच्या मागे कोणते पक्ष ?

एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड ७१ वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजाचे आहेत. त्यांची पार्श्वभूमी समाजवादी आहे. जनता दल (युनायटेड), वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, एआयएडीएमके आणि शिवसेनेने धनखड यांना पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांच्या समर्थनामुळे एनडीएच्या उमेदवाराला जवळपास ५१५ मते मिळण्याची अपेक्षा आहे.

अल्वा यांना आतापर्यंत मिळालेला पक्षांचा पाठिंबा पाहता त्यांना जवळपास २०० मते मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मतदानाच्या एक दिवस आधी अल्वा यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले होते की, “संसदेचे कामकाज प्रभावीपणे चालवायचे असेल, तर खासदारांना एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि तुटलेला संवाद पुनर्संचयित करण्याचे मार्ग शोधावे लागतील. शेवटी खासदारच आपल्या संसदेचे चारित्र्य ठरवतात. खासदारांसाठी आयोजित डिनरच्या वेळी त्या म्हणाल्या कि , “सर्व पक्षांनी एकमेकांमधील विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी आणि संसदेची प्रतिष्ठा पुनर्संचयित करण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे.”

मतदान संपताच मतमोजणीला सुरुवात …

दरम्यान धनखड यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी भाजप खासदारांची भेट घेतली. यामध्ये सुशील कुमार मोदी, गौतम गंभीर, राज्यवर्धन राठोड, राजेंद्र अग्रवाल यांचा समावेश होता. संसद भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होत आहे.  त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.

एम व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत असून नवे उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेतील. लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांचा  निवडणूक प्रक्रियेत समावेश केला जातो. नामनिर्देशित सदस्यही यामध्ये मतदान करण्यास पात्र आहेत. संसदेचे सध्याचे संख्याबळ ७८८ असून, त्यापैकी केवळ भाजपचे ३९४ खासदार आहेत. विजयासाठी ३९० पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे.

धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली, तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष एकाच राज्याचे असतील, हा योगायोग म्हणावा लागेल. सध्या ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात.

या निवडणुकीत खुल्या मतदानाची संकल्पना नसून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई आहे. सन १९७४ च्या नियमात विहित केलेल्या मतदान प्रक्रियेत मतदान कक्षात मत चिन्हांकित केल्यानंतर मतदाराने मतपत्रिका दुमडून मतपेटीत टाकण्याची तरतूद आहे. मतदान प्रक्रियेचे कोणतेही उल्लंघन झाल्यास पीठासीन अधिकारी बॅलेट पेपर रद्द करेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!