AurangabadNewsUpdate : सकाळच्या सत्रात आता मुंबई , दिल्लीला जाणे झाले सोपे

औरंगाबाद : ऑगस्टमध्ये औरंगाबादेतून मुंबई आणि दिल्लीसाठी आणि परत औरंगाबादला सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. एअर इंडियाने औरंगाबादकरांची ही अडचण दूर केली आहे. येत्या २० ऑगस्टपासून मुंबई व दिल्लीसाठी औरंगाबादहून सकाळची विमानसेवा सुरु होणार आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानसेवेंतर्गत मुंबईहून औरंगाबादसाठी सकाळी सात वाजता विमान निघेल. हे विमान औरंगाबादला आठ वाजून दहा मिनिटांनी पोचेल. औरंगाबादहून मुंबईकडे आठ वाजून पन्नास मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल. तर ते मुंबईला सकाळी दहा वाजता पोहोचेल. तसेच, दिल्लीहून औरंगाबादसाठी पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी एअर इंडियाचे विमान निघेल. हे विमान सकाळी सव्वासात वाजता औरंगाबादला पोहोचेल. औरंगाबादहून दिल्लीकडे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी निघेल. निघालेले हे विमान पावणेदहा वाजता दिल्लीत पोहोचेल. औरंगाबादहून दिल्ली व मुंबईसाठी एअर इंडियाची सायंकाळी असलेली विमानसेवा मात्र बंद राहणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे वेळापत्रक राहणार आहे.