MaharashtraNewsUpdate : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे नवे निर्देश
मुंबई : ज्येष्ठ विचारवंत दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे देण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन १ ऑगस्ट रोजी स्पष्ट करा, असे हायकोर्टाकडून राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. कॉ. पानसरे यांची २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती. मात्र तपासात म्हणावी तशी अद्याप प्रगती झालेली नाही. हे लक्षात घेऊन न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
‘कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील तपास संथगतीने होत असल्याने एसआयटीकडून हा तपास काढून घेत तो एटीएसकडे सोपवण्याचा आदेश द्यावा’, अशी विनंती मेघा पानसरे यांनी अर्जाद्वारे केली होती. त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वरिष्ठ अधिकारी आजारी असल्याने याबद्दल आवश्यक सूचना मिळू शकल्या नाहीत, असं म्हणणं विशेष सरकारी वकिलांनी मांडले. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर ‘हा विषय असाच रखडवला जाऊ शकत नाही. १ ऑगस्टला तुमचा निर्णय कळवा,’ असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.