AurangabadNewsUpdate : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबादच्या नामांतरावर तीव्र प्रतिक्रिया …
औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या धाराशीव नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र औरंगाबाद शहराच्या नामकरणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशारा खासदार जलील यांनी दिला आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नागरिकांसोबत गद्दारी केल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.
जलील म्हणाले कि , “उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात आले होते. उद्धव ठाकरे यांनी कोणती जादूची काडी फिरवली आणि विकास झाला? त्यानंतर औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा निर्णय घेण्यात आला. तुम्ही म्हणाले होते, की मी या शहराला पाणीपुरवठा करेन, या शहराचा विकास करेन. मात्र याचं काय झालं, याचं उत्तर त्यांना द्यावं लागलं. कोरोनाची लागण झाली असेल तर ऑनलाईन येऊन उत्तर द्यावे. खालच्या दर्जाचे राजकारण करुन शहरात दंगा घडवून आणला जाऊ शकत नाही,” असे जलील म्हणाले.
जनतेला शांतता राखण्याचे आवाहन
दरम्यान “मी औरंगाबाद तसेच उस्मानाबादच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करतो. सर्व रस्ते बंद झाले आहेत, असे नाही. आम्ही दुसऱ्या मार्गांचा अवलंब करू. काँग्रसे आणि राष्ट्रवादीने नेहमी खुर्ची वाचण्याचा खेळ केला. मला माहिती मिळाली आहे की काँग्रेसचे दोन मंत्री मंत्रिमंडळाची बैठक सोडून आले. त्यांनी राजीमाना द्यावा. नाटक करुन जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करु नये. कितीही नावे बदलली तरी औरंगाबादच्या जनतेसाठी औरंगाबाद शहर हे औरंगाबादच असेल,” असेदेखील जलील म्हणाले.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनीदेखील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाच्या निर्णयानंतर आपला निषेध नोंदवला. “औरंगाबाद तसेच उस्मानाबाद शहराच्या नामकरणाच्या निर्णयाचा निषेध करतो. मुस्लीम आरक्षणाकडे या सरकारने दुर्लक्ष केलं. जे भाजपा पक्ष म्हणतो तेच महाविकास आघाडी सरकार म्हणत आहे,” असे अबू आझमी म्हणाले आहेत.