Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : नूपूर शर्माचे समर्थन बेतले जीवावर, टेलरची हत्या , उदयपूरमध्ये हिंसाचार

Spread the love

उदयपूर :  नूपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या टेलर कन्हैया लाल साहूची राजस्थानमधील उदयपूरमध्ये मंगळवारी भरदिवसा हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी गर्दीच्या बाजारपेठेत त्याच्या दुकानात घुसून चाकूने हल्ला केला. एका हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला आणि दुसऱ्याने त्याचा व्हिडिओ बनवल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. मात्र, पोलिसांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवा टाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान या प्रकरणामुळे उदयपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटही बंद करण्यात आले असून ६०० अतिरिक्त पोलीस तेथे पाठवण्यात आले आहेत. सायंकाळी उशिरा राजसमंद येथून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून गौस मोहम्मद मुलगा रफिक मोहम्मद आणि रियाझ मुलगा अब्दुल जब्बार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही उदयपूरच्या सूरजपोल भागातील रहिवासी आहेत. दुसरीकडे एनआयएची टीमही उदयपूरला रवाना झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दहशतवादी घटना मानून तपास पुढे नेण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. टेलरने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट केल्याचे बोलले जात आहे. यानंतर त्यांची जाहीर हत्या करण्यात आली. ही अत्यंत संतापजनक घटना असून या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे सीएम गेहलोत यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. विरोधी पक्षनेते गुलाबचंद्र कटारिया यांनीही मुख्यमंत्र्यांशी हेलिकॉप्टरमधून चर्चा झाल्याचे सांगितले आहे. ही अत्यंत निंदनीय घटना आहे. आरोपींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते या घटनेबद्दल बोलत आहेत.

नेमकी घटना काय ?

वृत्तानुसार, उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन परिसरातील मालदास स्ट्रीटमध्ये दोन ते तीन लोकांनी भरदिवसा एका तरुणाची हत्या केल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर धानमंडी व घंटाघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह एमबी रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कन्हैयालालच्या आठ वर्षांच्या मुलाने त्याच्या मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मात्र, यानंतर धनमंडी पोलिसांनी कन्हैयालालला अटक केली. असे असतानाही एका विशिष्ट समाजाचे लोक सतत कन्हैयालालला धमकावत होते आणि मंगळवारी संधी साधून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली.

मुलाने केली होती सोशल मीडियावर पोस्ट

काही दिवसांपूर्वी नुपूर शर्माने केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. इथेही विशिष्ट समाजात नाराजी होती. दरम्यान, कन्हैयालाल यांच्या मुलाने एक पोस्ट केली. यामुळे एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सततच्या धमक्या मिळाल्याने कन्हैयालाल चांगलाच घाबरला. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, कन्हैयालालला अटक केल्यानंतरही मारेकरी त्याला धमकावून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. कन्हैयालाल यांनी धानमंडी पोलीस ठाण्यात माहिती देऊन बंदोबस्ताची मागणी केली.

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही…

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी कन्हैयालालला सुरक्षा पुरवली असती किंवा धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली असती तर कन्हैयालालला जीव गमवावा लागला नसता. मालदास गल्लीत भरदिवसा खून झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर मालदास गल्लीतील व्यापाऱ्यांनी एक एक करून सर्व दुकाने स्वत:हून बंद करून एका ठिकाणी जमून आपला संताप व्यक्त केला. पोलिसांकडून आरोपींवर कडक कारवाईची मागणी व्यापाऱ्यांनी केली. या घटनेनंतर उदयपूरमध्ये शेकडो लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर जमावासोबत टायर जाळताना दिसत होते. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी दुकाने बंद ठेवली.

उदयपूरचे खासदार अरुण लाल मीणा म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे आणि जोधपूर आणि इतर ठिकाणी यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. उत्तर प्रदेश सरकार ज्या प्रकारे अशांतता निर्माण करणाऱ्या घटकांशी वागते, तेच पाऊल गेहलोत सरकारने उचलले पाहिजे, असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!