ShivsenaNewsUpdate : महाराष्ट्रातील शिवसेनेचे महाभारत , दुपारपर्यंत काय घडले ते पहा …
मुंबई / गुवाहाटी : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना २४ तासांत परत येण्यास सांगितले आहे. बंडखोर नेत्यांना आश्वासन देताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सोडण्याचा विचार करणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या छावणीत पक्षाच्या आमदारांची संख्या वाढत आहे. ‘शिंदे’ टीममध्ये शिवसेनेचे ४२ आमदार झाले असल्याचा व्हिडीओ शिंदे यांनी जारी केला आहे.
शिंदे – राऊत यांचे परस्पर विरोधी दावे
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ४२ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला असला तरी त्याला पक्षनेते संजय राऊत यांनी आव्हान दिले आहे. शिंदे यांच्याकडे वळलेल्या ४२ आमदारांपैकी निम्मे आमदार परत येण्यासाठी ‘संपर्कात’ असल्याचा दावा पक्षाच्या नेत्याने केला आहे.
ही आहे आमदारांची भावना… pic.twitter.com/U6FxBzp1QG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
सुमारे ४२ आमदारांसह गुवाहाटीत तळ ठोकून बसलेले एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय सिरसाट यांनी लिहिलेले एक पत्र ट्विट करून त्यात म्हटले आहे की, “मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचे दरवाजे अडीच वर्षांनंतर सर्व सामान्य शिवसैनिकांसाठी उघडले याचा आनंद वाटतो. आमदारांना उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी करावी लागायची. इतरही अनेक गोष्टी यात लिहिलेल्या आहेत.
शिंदे यांच्याकडे आमदार वाढत असल्याचा दावा
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या छावणीत पक्षाच्या आमदारांची संख्या वाढत आहे. ‘शिंदे’ टीममध्ये शिवसेनेचे ४२ आमदार आहेत. पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्रतेचा सामना न करता पक्ष तोडण्यासाठी शिंदे यांना शिवसेनेच्या ३७ आमदारांची गरज होती. सूत्रानुसार दुपारपर्यंत ही संख्या वाढणार आहे.
दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले आणि वांद्रे येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी गेले. दुसरीकडे, पक्षाच्या अस्तित्वासाठी शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेसच्या ‘अनैसर्गिक युती’तून बाहेर पडावे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मांडली आहे. विशेष म्हणजे शरद पवार आणि काँग्रेसने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची सूचना केल्याच्या वृत्तानंतर एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य आले आहे.
आणखी काही आमदार गुवाहाटीला पोहोचले…
आज सकाळी शिवसेनेचे तीन आमदार दीपक केसकर (सावंतवाडीचे आमदार), मंगेश कुडाळकर (चेंबूर) आणि सदा सरवणकर (दादर) आसामला रवाना झाले, जिथे बंडखोर आमदार तळ ठोकून आहेत. केसकर यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “काल (एकनाथ) शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 37 आमदार होते. आज मी इतर तीन शिवसेना आमदार आणि एका अपक्षांसह येथे पोहोचलो. येत्या काही तासांत दोन ते तीन आमदार येण्याची अपेक्षा आहे.”
ठाकरे म्हणाले , माझ्या समोर या आणि सांगा …
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीमुळे राजीनामा देण्याची ऑफर दिल्यानंतर काही तासांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री आपल्या १८ मिनिटांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये बंडखोर नेते आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले. आपण अननुभवी असल्याची कबुली देत गेल्या वर्षाच्या अखेरीस मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे अनेकांना भेटू शकलो नाही, असे सांगितले. ते (ठाकरे) पक्षाचे नेतृत्व करण्यास सक्षम नाहीत, असे शिवसैनिकांना वाटत असेल, तर आपण मुख्यमंत्री पद आणि शिवसेना अध्यक्षपदही सोडण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले, सुरत आणि इतर ठिकाणाहून विधाने का करताय? माझ्यासमोर या आणि मला सांगा की, मी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्षपदे हाताळण्यास सक्षम नाही. मी लगेच राजीनामा देईन. मी माझा राजीनामा तयार ठेवतो आणि तुम्ही राजभवनात येऊन घेऊन जाऊ शकता.
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी ठाकरे यांच्याविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. बग्गा यांनी कोविड-१९ प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ठाकरे यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून ते त्यांच्या वैयक्तिक निवासस्थानी जाताना त्यांनी समर्थकांची भेट घेतली.