MaharashtraPoliticalUpdate : भाजपच्या विजयला चमत्कार मानण्यास देवेंद्र फडणवीस यांचा नकार …
मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. यावर आपली प्रतिक्रिया देताना भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाचव्या जागेच्या विजयाला चमत्कार मानण्यास नकार देत आमदारांच्या मनात असलेला असंतोष मतांमध्ये परावर्तित झालेला आहे. हा असंतोष वाढत राहिला तर काय होईल, याचा विचार करावा. असे खडे बोल महाविकास आघाडीला सुनावले आहेत.
या विजयाबद्दल पक्षांच्या आमदारांचे आणि अपक्ष आमदारांचे आभार मानताना फडणवीस म्हणाले कि , आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही आमचा संघर्ष जनतेसाठी आहे. विधानपरिषद निवडणुकीत आमचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. आम्ही राज्यसभेला १२३ मतं मिळवली होती. आता आम्ही १३४ मतं मिळवली आहेत. महाविकास आघाडीवर आमदार नाराज आहेत. पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं. तरीही आमचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले.
विशेष म्हणजे राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही फडणवीसांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाचा करिश्मा करुन दाखवला. महाविकास आघाडीच्या मतांना त्यांनी अक्षरश: सुरुंग लावला. राज्यसभेत फडणवीसांनी मविआची १० मते फोडली होती. यावेळी त्यांनी मविआची २० मते फोडून आघाडीला दे धक्का दिला आणि भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले.
साहजिकच विजयानंतर भाजपने दणक्यात सेलिब्रेशन केले. दिवसभर विधिमंडळात ठाण मांडून बसलेल्या फडणवीसांनी विजयी उमेदवारांची घोषणा होताच विधिमंडळाबाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधताना ही परिवर्तनाची सुरुवात आहे, जोपर्यंत महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार येत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरु राहील. आमचे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक अत्यंत अडचणी असून देखील ते इथं आले आणि विजयाला हातभार लावला . देशात मोदींची लाट आहे. महाराष्ट्र देखील मोदींच्या पाठिशी असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.