AurangabadNewsUpdate : कोटा निश्चितीच्या नवीन नियमांमुळे कृत्रिम इंधन टंचाईची शक्यता
औरंगाबाद : पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी झाल्याने अनेक पेट्रोल पंप ड्राय आहेत. अशा परिस्थितीत ऑईल कंपन्यांकडून पंप चालकांसाठी कोटा निश्चितीचा नवीन नियम आमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आगामी काळात शहरात कृत्रिम टंचाई भासण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहरासह जिल्हयात तसेच राज्यातील विविध भागातील पंप चालकांना पेट्रोल आणि डिझेलचा मागणीनुसार पुरवठा होत नाही. सध्या २५ टक्के पेक्षा अधिक पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठा कमी करण्यात येत आहे. यामुळे अनेक पंप चालकांना नो स्टॉकचा बोर्ड लावावा लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार सह अन्य भागात पन्नास रूपयांपेक्षा कमी पेट्रोल विक्रीवर बंधने टाकण्यात आली होती. याशिवाय पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्यांना पेट्रोल खरेदीची प्रिंट देणे पंप चालकांना बंधन कारक करण्यात आली होती. या निर्णयामुळे पंप चालक अडचणीत आले होते. औरंगाबादेत हा नियम लागू करण्यात आलेला नाही. मात्र, आता ऑईल कंपनीकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्याबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामध्ये एका पंपावर सामान्य दिवसात किती लिटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. याची माहिती ऑईल कंपन्यांकडे ऑनलाईन आहे. या माहितीचा वापर करून संबंधीत पेट्रोल पंपावर किती पेट्रोल लागत आहे. याचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा एखाद्या पंप चालकाने पार केल्यानंतर त्याला पुढील पेट्रोल दिले जात नाही. ऑईल कंपन्यांचा हा निर्णयही पंप चालकांसाठी अडचणीचा ठरत आहे. हा नियम सध्या उत्तर महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. यानंतर लवकरच हा निर्णय औरंगाबाद व मराठवाड्यातील पंप चालकांना लागू केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सामान्य नागरिकांचा रोष पत्करावा लागेल….
पेट्रोल रेशनींगचा मुद्दा आम्ही पहिल्या पासून मांडत आहोत. पुर्वी विक्री वाढवा असे कंपनीकडून सांगितले जात आहे. आता विक्री कमी करा. असा संदेश ऑईल कंपनीच्या निर्णयामुळे समोर येत आहे. औरंगाबादेत हा निर्णय लागू झालेला नाही. मात्र कोटा सिस्टम औरंगाबादसह जिल्हयातील पंप चालकांना ठरविला गेल्यास, पंप चालकांना सामान्य नागरिकांचा रोष पत्करावा लागेल.