MaharashtraCoronaUpdate : राज्यात पुन्हा “मास्क”ची सक्ती ? जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती ?
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल होत असून त्यावरून राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्कबाबत राज्य सराकरचं नेमकं आवाहन काय आहे, याविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यात मास्कची ‘सक्ती’ नाही
मास्कसक्तीविषयी चर्चा सुरू असली, तरी राज्यात मास्कसक्ती नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. “मुंबई, पुणे, पालघर आणि रायगडचा काही भाग, ठाणे या भागात थोडीफार संख्या वाढत आहे. त्याला अनुसरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या लोकांनी पत्र पाठवले आहे की या विभागांसाठी तुम्हाला रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या बाबतीत परवा टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरले की जिथे गर्दीची ठिकाणे आहेत, तिथे मास्क वापरण्याचे आवाहन करावे . ते सक्तीचे नाही”, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ज्या ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे त्या भागात गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापरावा. खुल्या ठिकाणी त्यात शिथिलता असली तरी हरकत नाही. त्याला जोडून लसीकरण, बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चाचण्या वाढवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून याबाबत तीन पानांची नोट काढण्यात आली असून ती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे”, असे स्पष्टीकरणही राजेश टोपे यांनी दिले आहे.
रुग्णसंख्येमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही…
काही भागात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या जरी वाढत असली, तरी रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात नगण्य वाढ झालेली आहे. त्यामुळे या बाबतचे रुग्ण फ्लूच्या आजारासारखे पॉझिटिव्ह होत आहेत आणि बरे होत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. जे लोक पॉझिटिव्ह होत आहेत, ते त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या जोरावरच बरे होत आहेत असे माझे निरीक्षण आहे”, असे त्यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मास्क वापराबाबतच्या सूचनांचं एक पत्रक जारी केलं आहे. त्यांनी म्हटले आहे कि , खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह , रुग्णालय, शाळा,कॉलेज, बाजारपेठ आणि महाविद्यालयाच्या ठिकाणी देखील मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.