AurangabadNewsUpdate : औरंगजेब कबर विवाद : पुरातत्व खात्याचा मोठा निर्णय…
औरंगाबाद : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद केली आहे. स्थानिक मस्जिद कमिटीने कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केल्यानंतर एएसआयने हे पाऊल उचलले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी मंगळवारी औरंगजेबाच्या कबरीची गरज नसून ती पाडली पाहिजे, असे म्हटले होते. जेणेकरून लोक तिकडे जाऊ नयेत.
या वक्तव्यानंतर औरंगाबादच्या खुलदाबाद परिसरातील मशीद समितीने या कबरीच्या गेटला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर एएसआयने समाधीची सुरक्षा वाढवली आहे. ASI चे औरंगाबाद क्षेत्राचे अधीक्षक मिलन कुमार चौले यांनी पीटीआयला सांगितले की, “याआधी मशीद समितीने मकबऱ्याला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही तो उघडला होता. मात्र, बुधवारी आम्ही हे पर्यटन स्थळ पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान “आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करू आणि नंतर ते उघडायचे की आणखी पाच दिवस बंद ठेवायचे ते ठरवू,” असे या चौले यांनी सांगितले. या ठिकाणी दंगली होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीनचे (एमआयएम ) नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवून फुले अर्पण केली होती. त्यावरून सत्ताधारी शिवसेनेसह भाजप आणि मनसेने एमआयएमवर टीका केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या लोकांना असे करून महाराष्ट्रातील शांततापूर्ण प्रशासन बिघडवायचे आहे का, अशी शंका उपस्थित केली होती.
पुरातत्व विभागाने सदरील पत्राची प्रत औरंगजेब मकबरेच्या व्यवस्थापक, पोलीस निरीक्षक, जिल्हाअधिकारी, ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना ही पाठवली आहे अशी माहिती भारतीय पूरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर यांनी दिली आहे.
कबरीवर चाल करून जाण्याची अफवा
दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जवळील खुलताबाद येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही लोक औरंगजेबच्या कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा पसरली होती. त्यामुळे लगेच कबरीचे मुख्य दार बंद करण्यात आले. अफवा नागरिकांच्या कानावर पडताच स्थानिक नागरिकही जमायला सुरुवात झाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ औरंगजेबच्या कबरीकडे धाव घेतली. पोलिसांनी काही झाले नाही, काही होणार नाही, असे समजावत नागरिकांना तिथून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. आता कबरीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.