MaharashtraPoliticalUpdate : कोणी काहीही म्हणोत पटोले यांच्या मते २०२४ ला राहुल गांधीच पंतप्रधान
पुणे : दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या बैठकीत शरद पवार यांना राष्ट्रीय पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष करण्यात यावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी या सध्या यूपीएच्या अध्यक्ष आहेत. आता मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भूमिका स्पष्ट करत उत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी पुण्यात आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. राहुल गांधी द्रष्टे नेते असून २०२४ मध्ये तेच पंतप्रधान होतील, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला आहे.
पटोले पुढे म्हणाले कि, भाजप कडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे. त्याला जनता कंटाळली आहे, यात दुमत नाही, तर राहुल गांधींकडे व्हिजन आहे. २०१९ च्या करोना महामारीची सूचना सर्वप्रथम राहुल गांधींनीच दिली होती. पण त्यावरून टिंगलटवाळी करण्यात आली होती. या देशाला पुढच्या काळात काँग्रेसच सांभाळू शकते. म्हणून मी ट्विट केले आहे, भाजपच्या कामाला जनता कंटाळली आहे. देशपातळीवर भाजपला मोडीत काढायचे असल्यास काँग्रेसच पर्याय आहे. राज्य पातळीवरच्या पक्षांनी वेगळा विचार केल्यास पर्यायाने भाजपला मदतच केली जाईल, असे नाना पटोले म्हणाले. सोनिया गांधी यूपीएचं नेतृत्व करत आहेत आणि त्या सक्षम आहेत. पण हा त्यांच्या पक्षाचा विचार आहे. मात्र, काँग्रेसला सोडून यूपीए होऊच शकत नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
….थोडी धुसफूस तर होणारच
दरम्यान युती सरकारच्या काळात भाजप-शिवसेना सरकारमध्ये धुसफूस होती. हे ३ पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे थोडं कमी जास्त होणारच. आमदार आपल्या मतदारसंघात काम करतात. त्यांना पक्षाध्यक्षांना भेटायची इच्छा असते ते भेटू शकतात, असं स्पष्टीकरण पटोले यांनी काँग्रेस आमदारांच्या कथित नाराजीवर दिले. रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले कि , कोकणाला निसर्गाने भरभरून दिले. पण पाहिजे तसा विकास तिथे झाला नाही. नाणार येथील प्रकल्पाबद्दल गैरसमज होतील, असे वातावरण झाले आहे. गैरसमज पसरवले आहेत. सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, लोकांचे गैरसमज दूर करावे, असे नाना पटोले म्हणाले. मात्र, लोकांचा विरोध असेल तर विदर्भात जागा आहे, तिथे हा प्रकल्प घेऊन जाऊ शकतो. मात्र हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ नये याची काळजी घ्यावी, असं ते पुढे म्हणाले. दरम्यान, नाणार येथील प्रकल्पाला तुमचा पाठिंबा आहे का?, असे पटोले यांना विचारण्यात आलं. ‘निसर्गाला कुठेही हानी पोहचणार नाही, असे मी ऐकले आहे’, असे उत्तर पटोले यांनी दिले.