MaharashtraNewsUpdate : ट्रक व तवेरा कारच्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
अमरावती : अमरावती शहरातील रहाटगाव रिंगरोडवर ट्रक व तवेरा कारच्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी असून सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओव्हरटेकच्या नादात हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अमरावतीवरून नागपूरच्या दिशेकडे जात होता तर तवेरा कार अमरावतीवरून वलगावकडे जात होती. तवेरा वाहनातील मृतक व जखमी हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत. तर तवेरामधील लोक हे वलगाव येथे साक्षगंध सोहळ्याला जात असल्याची माहिती आहे.
अमरावती शहरातील रहाटगाव रिंगरोडवर तवेरा गाडी पोहोचली असता ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात तवेरा कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एका गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल करत असता मृत्यू झाला. या अपघातात ५ जण जखमी झाले आहे. जखमींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार असून रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाऊन नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली.