MaharashtraEducationUpdate : शाळांचे ग्रहण सुटले , राज्यातील शाळा होणार आता पूर्ववत सुरु …
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शाळेला कोरोनामुळे लागलेले ग्रहण आता सुटले आहे.
या परिपत्रकानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. तसेच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत. तसंच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगीही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा कधी घेण्यात याव्यात या संबंधीच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात याव असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यानच्या काळात कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत होते. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र यातही संपूर्ण उपस्थितीसह विद्यार्थ्यांना शाळांना परवानगी नव्हती. मात्र आता अखेर शालेय शिक्षण विभागाकडून १०० टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात परवानगी देण्यात आली असल्याने विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.