MaharashtraPoliticalUpdate : नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
मुंबई : ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता त्यांचे मंत्रिपद कायम ठेवत त्यांच्याकडील खात्याचा अतिरिक्त पदभार हा जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे सोपवणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी विविध राजकीय विषयावर निर्णय घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह सुप्रिया सुळे यांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीमध्ये विशेषतः मुंबई कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, नवाब मलिक राजीनामा, पेनड्राईव्ह प्रकरणाबाबत चर्चा झाली.
या बैठकीत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, यावर एकमत झाले. मात्र त्यांच्याकडील खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांना सोपवण्यात येणार आहे. कौशल्य विकास खाते हे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि अल्पसंख्याक विभागाचाा कारभार हा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली तर, या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने मुंबईसाठी दोन नवे कार्याध्यक्ष दिले जाणार आहे. नरेंद्र राणे आणि राखी जाधव यांच्यावर अतिरिक्त कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. दरम्यान नवाब मलिक यांचा जामीन फेटाळल्याने त्यांचे मंत्रिपद कायम ठेवत त्यांच्या खात्यांची जबाबदारी आणि पालकमंत्रिपद, पदभार इतर मंत्र्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर हे बदल जाहीर करू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने डांबल्याचा आरोप
दरम्यान परभणीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांना तर गोंदियासाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवण्यात आले . जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही पर्यायी व्यवस्था उभी करणार आहोत. नवाब मलिक हे बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम राहतील. मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील पुढे म्हणाले कि , कथित पेनड्राईव्ह प्रकरण खरे-खोटेपणा तपासल्यावर बोलले पाहिजे. फॉरेन्सिक, सत्यता न तपासता लोकांपुढे मांडण हे चुकीचे आहे. एखाद्या वकिलाचे भाष्य कितपत ऐकायचे ? 2024 ला आमची सत्ता येणार. 24 पर्यंत आमचे सरकार राहणार हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले म्हणून त्यांचे आभार. विरोधात बसले आहे तर योग्य विरोधक म्हणून काम करा, हा आमचा त्यांना सल्ला आहे, असा टोलाही पाटील यांनी फडणवीसांना लगावला. फडणवीस वकील आहेत . त्यांनी फॉरेन्सिक तपासणी केल्याचा पुरावा, सरकारला दिला नाही. एखादा वकील त्याच्या घरात बोलला, तर त्याचा काय संबंध? असेही पाटील म्हणाले.