Maratha Reservation : शिवसेनेचे नेते खा. संभाजीराजे यांच्या उपोषणस्थळी येताच मराठा कार्यकर्ते आक्रमक
मुंबई : मी २००७ पासून या मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात आहे कोणावर टीका करण्यासाठी म्हणून मी उपोषण करत नसल्याची स्पष्टोक्ती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी होत आहेत. दरम्यान यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून संभाजी महाराजांनी आपलं उपोषण परत घेण्याची विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज उपोषणस्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह सेने नेत्यांनी हजेरी लावताच मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते यांना संभाजी राजे यांनी शांत केले.
दरम्यान खा . संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाल्यापासूनच वेगेवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते हे आंदोलनस्थळी भेट देत आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही खा. संभाजीराजे यांची भेट घेतली. महापौर उपोषणस्थळी दाखल होताच मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन सुरू केली. याच दरम्यान, मंचावरून बोलत असताना संभाजीराजे म्हणाले की, ”सगळ्यांच्या भावना आक्रोश मी समजू शकतो. मी २००७ पासुन या लढ्यात आहे. मी टिका करण्यासाठी उपोषण करत नाही. समाजाला वेठीस धरु नये.” महाविकास आघाडी सरकार मार्ग काढू शकते, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. गरीब मराठा समाजाला न्याय द्या, आताचा राग कोणाबद्दल नाही, असेही संभाजीराजे म्हणाले. मला कोणाला दोषी धरायचे नाही. या समाजाला न्याय मिळायला हवा ही माझी प्रमाणिक इच्छा असल्याचे संभाजीराजे म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावरून हटणार नाही, असा पवित्रा संभाजी राजेंनी घेतला आहे. त्यामुळे आज त्यांना भेट देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते. मात्र, त्यांना मराठा तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
सेनेचे नेते येताच मराठा कार्यकर्ते आक्रमक
खासदार संभाजी राजेंची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे नेते आझाद मैदानात आले होते. यामध्ये खासदार अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर आणि अरविंद सावंत यांचा समावेश आहे. पण, यावेळी आझाद मैदानात बसलेल्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर संभाजी राजेंनी स्वतः उभे राहून कार्यकर्त्यांना शांत केलं. ”माझ्यासमोर असा उद्रेक होणे बरोबर नाही. तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर हे योग्य नाही. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही माझे मित्र आहेत. आपला मराठा समाजाचा लढा दीर्घकाळाचा आहे. त्यामुळे तुम्ही सर्व शांततेच्या मार्गाने लढा द्या”, असे आवाहन संभाजी राजेंनी तरुणांना केले . त्यानंतर महापौरी किशोरी पेडणेकर आणि सेनेच्या खासदारांसोबत चर्चा केली. आम्ही त्वरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून मराठा आरक्षणावर मार्ग काढतो, असे आश्वासन सेनेच्या नेत्यांनी दिले.
संभाजी राजे यांनी १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या उपोषणाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. एकाच दिवसात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत . तसेच भाजप नेते देवेन्द्र फडणवीस यांच्यासह अनेक संघटनांनी देखील राजेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये. केवळ वेळकाढू धोरण अवलंबू नये. भारतीय जनता पार्टी या लढ्यात मराठा बांधवांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सोडवावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.