MaharashtraEducationUpdate : मोठी बातमी : दहावी -बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईनच होतील
पुणे : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नव्हे तर ऑफलाइनच होणार असल्याचे परीक्षा मंडाळाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या अपरीक्षा ठरलेल्या वेळा पत्रकानुसारच होतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना ही अधिकृत माहिती दिली. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या विषयावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असले तरी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असल्याने ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बोर्डाने जाहीर केल्यानुसार दहावीची लेखी ऑफलाईन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्याने ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटे अधिक वेळ दिला जाईल. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसंच १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचे महाविद्यालय केंद्र म्हणून दिले जाईल.
राज्यातून दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख २५ हजार ३११ अर्ज बोर्डाला प्राप्त झाले असून बारावीसाठी १४ लाक ७२ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेआहेत . दहावी आणि बारावीचे मिळून एकूण ३१ लाख हि परीक्षा देत असल्याने या सर्वांची ऑनलाईन परीक्षा शक्य नसल्याचे यावेळी शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. महत्वाचे म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना लस बंधनकारक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. यामुळे त्यांनी परीक्षा देताना परिचित वातावरण मिळेल आणि कमी प्रवास करावा लागेल असं शरद गोसावी यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्याक्रमावर करण्यात आलं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. शाळा तिथे परीक्षा केंद्र असून बहिस्थ नाही तर शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर असतील.
दरम्यान परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. कोरोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणे आढळून आली दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. तसेच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फेत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.