MarathawadaNewsUpdate : धक्कादायक : रमाबाई भीमराव आंबेडकर बचत गटाकडून धान्य घेण्यास गावकऱ्यांचा नकार
शाळेत अन्न धान्य आणूनही कोणीही धान्य घेण्यासाठी न आल्याने प्रशासन हतबल
रत्नदीप शेजवळे
जिंतूर : परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील राजेगाव येथील राशन दुकान यांच्याकडून स्थानिक ग्रामस्थांनी धान्य घेण्यास नकार दिल्याने राशन दुकानदार आणि स्थानिक रेशनकार्ड यांच्यातील शीत युध्द चांगलेच पेटल्याचे चित्र दिसत आहे. राशन दुकानातून धान्य घेण्यास नकार दिला जात असल्याने मागास्वर्गीयांविषयी पराकोटीचा तिरस्कार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे प्रशासनाने या प्रकरणात मागास महिलांच्या बचत गटाकडून धान्य घेण्यास नकार देणाऱ्या लोकांविरोधात कठोर भूमिका घेण्यापेक्षा नरमाईने संबंधित स्वस्त धान्य दुकान थेट गावातील शाळेच्या ओट्यावर आणून ग्रामस्थांची मनधरणी करूनही कोणी धान्य घेण्यास आले नाही. आणखी संतापजनक बाब म्हणजे स्वस्त धान्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी शाळेच्या बाकावर , खुर्च्यांवर बसलेले असून स्वस्त धान्य दुकानाच्या चालक आणि बचत गटाच्या अध्यक्षा ओट्यावर खाली हताशपणे बसल्या आहेत.
याविषीयीची सविस्तर माहिती अशी कि, जिंतूर पासून 14 किमी अंतरावर असणाऱ्या राजेगाव येथील रमाबाई भीमराव आंबेडकर महिला बचत गटाकडे गावातील रेशनकार्ड धारकांना रेशनसाठी रास्त भाव दुकान परवाना देण्यात आला आहे. या गटाकडे जवळपास130 रेशनकार्ड धारक आहेत पूर्वी हा परवाना पांढरगळा येथील सुमन किशन कवडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तिथून हा परवाना वर्ग करून राजेगाव येथील रमाबाई आंबेडकर बचत गटाच्या अध्यक्ष मीना संजय वाहूळे यांना देण्यात आला आहे. परंतु दोन्ही बाजूंचा अंतर्गत वाद आणि गावशत्रुत्वाची कुरापत काढून गावातील 130 रेशनकार्ड धारकांनी वाहूळे यांच्या बचत गटाचा परवाना रद्द करून पूर्वी असलेल्या पांढरगळा येथील सुमन कवडे यांच्याकडे सोपवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. वरील दोन्ही बाजूंच्या परस्पर तक्रारीचा वाद सध्या तालुका आणि जिल्हा प्रशासनाच्या न्यायासनासमोर सुरू आहे.
अन..पुरवठा विभागाचे अधिकारी दिवसभर बसून परत फिरले..
जिंतूर तहसिल कार्यालय पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार चारठाणा मंडळ अधिकारी सज्जाचे तलाठी गावचे पोलीस पाटील असे सर्वजन दि 13 आणि 25 जानेवारी रोजी गावातील जि.प.शाळेत रेशनकार्ड धारकांना धान्य वाटप स्वीकारण्यासाठी आवाहन केले असता एकाही रेशनकार्ड धारकांनी धान्य स्वीकारले नाही, तहसील कार्यालयाने घटनेचा स्थळ पंचनामा करून आले तसे परत यावे लागले होते.
….कवडे यांच्याकडूनच धान्य घेणार.. गावकऱ्यांचा पावित्रा
राजेगाव येथे 130 रेशनकार्ड धारक असून एकही कार्ड धारक रमाबाई आंबेडकर बचत गटाकडून धान्य घेण्यासाठी तयार होत नाही. देवीदास हरीसिंग राठोड यांनी गावकऱ्यांकडून सादर अर्जावर धान्य घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पुर्वीप्रमाणे सुमन कवडे यांच्याकडुनच आम्ही धान्य स्वीकारणार असल्याचे अर्जात नमूद केले आहे.
केवळ जातीय द्वेषातूनच आमचा छळ केला जात आहे…
गेल्या दोन वर्षांपासून आमच्या बचत गटाच्या विरोधात अर्जबाजारी करून मला जातीवाचक शिवीगाळ करून मानसीक छळ केला जात आहे. मी पुरवठा विभागाच्या आदेशानुसार सर्व गोष्टींचे पालन करुन सुद्धा मला बहिष्कृत करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही कायदेशीर बाबीत योग्य असुन केवळ जातीय द्वेषापोटीच आमच्या गटाकडून धान्य स्वीकारण्यास नकार दिला जात आहे.
-मीना वाहूळे बचत गट अध्यक्ष