MaharashtraNewsUpdate : आनंदाची बातमी : राज्यातील कॉलेजबरोबर शाळाही होताहेत सुरु….
जालना : प्रजासत्ताकदिनी एक मोठी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून या माहितीनुसार राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पाळून पूर्ववत सुरु होत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महाविद्यालये आणि पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. पण, आता पालकांकडून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरू करण्यास होकार दर्शवला आहे. विद्यार्थ्यांना जरी कमी प्रमाणात कोरोनाची लागण झाली असली तरी मुलांना कुठलीही लक्षणे दिसत नाही, किंवा कोणी कोरोनाबाधित झालेच तर ते लगेच बरेही होत आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दिनांक १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा जालन्यात निर्णय घेतला आहे.
महाविद्यालये सुरु करण्यास शासन अनुकूल
दरम्यान, राज्यातील शाळांप्रमाणेच महाविद्यालयेही सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना पाळून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरु करावीत असा विचार शासनापुढे विचाराधीन आहे. त्यानुसार येत्या 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व कॉलेजेस सुरू होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तशी मान्यता शासनाकडून देण्यात अली आहे. मात्र यापुढील निर्णय हा जिल्ह्यातील महानगरपालिकांकडे सोपवण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक अशा जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बघून कॉलेजेस सुरु होणार आहेत.