Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttraPradeshPolticalUpdate : योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांची भाजपाला सोडचिट्ठी

Spread the love

लखनऊ : उत्तर प्रदेशातील निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला सोडचिट्ठी दिल्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. 


स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्यपालांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात श्रम आणि सेवायोजना व समन्वय मंत्री असताना आपण विपरित परिस्थिती आणि विचाराधारेत राहून आपल्या कर्तव्याचे पालन केले. पण सरकारकडून दलित, मागस आणि शेतकऱ्यांच्या मुलांची बेरोजगारी, लघु आणि मध्यम श्रेणीतील व्यापाऱ्याची मोठी उपेक्षा करण्यात आली. यामुळे मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्यपालांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

दरम्यान आपल्या राजीनाम्यानंतर मौर्य यांनी सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांचीही भेट घेऊन अखिलेश यांनी भेटीचा फोटो शेअर केला आहे. मौर्य यांचे स्वागत करताना अखिलेश यादव म्हणाले की, सामाजिक न्यायाची क्रांती होईल, बावीसमध्ये परिवर्तन होईल. तिल्हार येथील भाजपचे आमदार रोशनलाल वर्मा हे देखील मौर्य यांच्यासोबत समाजवादी पक्षात प्रवेश करत असून त्यांच्याशिवाय बांदा येथील तिंदवारी मतदारसंघातील भाजप आमदार ब्रजेश प्रजापती आणि बिल्हौरमधील भाजप आमदार भगवती सागर यांनीही राजीनामा दिला आहे.

स्वामी प्रसाद मौर्य हे यूपी सरकारमध्ये मंत्री आणि ५ वेळा आमदार राहिलेले आहेत. ते यूपीतील पडरौना मतदारसंघाचे आमदार आहेत. ते मागास समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मोठे नेते आहेत. भाजपमध्ये येण्याच्या आधी ते बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते. शिवाय २०१२ ते २०१६ दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. ८ ऑगस्ट २०१६ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची कन्या संघमित्रा मौर्य या बदायूंतून भाजपच्या खासदार आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते लोकदल आणि बसपामध्ये होते.

दरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर यूपीत भाजपला हादरा बसला आहे. भाजपचे बेडे नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना चर्चेचे आवाहन केले आहे. स्वामी प्रसाद यांनी राजीनामा का दिला ? हे आपल्याला माहिती नाही. पण चर्चेतून मार्ग निघू शकतो. घाईघाईत घेतलेला कुठलाही निर्णय हा नेहमी चुकीचा असतो, असे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!