CMUddhavThackeryNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात , मानेच्या मणक्यावर होणार शस्त्रक्रिया
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना मानेचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना काल रिलायन्स उद्योग समुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आज त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली असून या माहितीनुसार त्यांच्या मानेवर उद्या सकाळी ७ ते ८ दरम्यान या रुग्णालयात शस्रक्रिया होणार आहे. जेष्ठ आर्थो सर्जन डाॅक्टर शेखर भोजराज हे ठाकरे यांच्यावर शस्रक्रिया करणार असल्याचे वृत्त आहे.
कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना काल बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती. मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झाले . सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आणि ते रुग्णालयात दाखल झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे रिपोर्ट संध्याकाळी आले. हे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डाँक्टर रिपोर्ट तपासतील आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. वरिष्ठ डॉक्टरांचा मुख्यमंत्र्यांना एक लहान शस्रक्रिया करण्याचा सल्ला आहे. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय ठाकरे कुटुबीयांशी चर्चा करून घेण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात एच एन रिलायंन्स हाँस्पिटलकडून कोणतेही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध केले जाणार नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहीती मुख्यमंत्री कार्यालयच देणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन करत प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करु नका, असे आवाहन केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.