AirIndiaNewsUpdate : “एअर इंडिया ” च्या वापसीनंतर “वेलकम बॅक एअर इंडिया”, रतन टाटा यांचे भावुक ट्विट !!
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणामुळे ‘एअर इंडिया’ची मालकी तब्ब्ल ६७ वर्षांनंतर ‘टाटा’कडे जाणार आहे. जेआरडी टाटा यांनी १९३२ साली ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे, पुढे १९४६ मध्ये ‘एअर इंडिया’ असे नामकरण केले गेले. १९४८ मध्ये ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ने युरोपसाठी उड्डाणेही सुरू केली. मात्र १९५३ मध्ये सरकारने एअर इंडियावर ताबा घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले.
Welcome back, Air India 🛬🏠 pic.twitter.com/euIREDIzkV
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 8, 2021
“वेलकम बॅक एअर इंडिया”
दरम्यान तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या विक्रीचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाने सार्वधिक बोली लावून हि निविदा जिंकली आहे. त्यामुळेच आता एअर इंडिया कंपनीची मालकी पुन्हा एकदा जवळजवळ सात दशकांनंतर मूळ मालकांकडे जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा झाल्यानंतर रतन टाटा यांनी ट्विटरवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत टाटांनी आपल्या पोस्टमध्ये जे. आर. डी. टाटा यांची आठवण काढतानाच केंद्रातील मोदी सरकारचेही आभार मानलेत.
आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , “टाटा समुहाने एअर इंडियासाठीची बोली जिंकली आहे ही फार छान बातमी आहे. एअर इंडिया पुन्हा उभारण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतील हे मान्य केलं पाहिजे. मात्र त्याचबरोबर यामुळे हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये टाटा समुहाला चांगली बाजारपेठ आणि संधी उपलब्ध होणार आहे,” अशा शब्दांमध्ये रतन टाटांनी याकडे संधी म्हणून पाहण्याचे संकेत कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि सर्वांनाच दिलेत. पुढे रतन टाटा यांना जे. आर. डी. यांची आठवण झाल्याचं त्यांच्या पोस्टमध्ये पहायला मिळतं. “या भावनिक क्षणी हे सांगू इच्छितो की एअर इंडिया जे. आर. डी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी जगातील सर्वात मैल्यवान एअरलाईन्स कंपनी होती. ती प्रतिमा पुन्हा निर्माण करण्यासाठी संधी टाटा समुहाला मिळाली आहे. पूर्वीसारखं स्थान आणि ओळख मिळवून देण्यासाठी ही नवी संधी आहे. आज जे. आर. डी आपल्यात असते तर त्यांना फार आनंद झाला असता”
दरम्यान या पोस्टच्या शेवटी त्यांनी, “तसेच यावेळी आपण सरकारचेही आभार मानले पाहिजेत की त्यांनी काही क्षेत्रांमधील धोरणे बदलून तेथे खासगीकरणासाठी संधी दिली आहे. ” असे म्हणत मोदी सरकारचेही आभार मानले आहेत. पत्राच्या शेवटी सही करण्याआधी त्यांनी, “वेलकम बॅक एअर इंडिया” असे म्हटले आहे.