CoronaIndiaUpdate : कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अधिक काळजी घेण्याची गरज , केंद्राचे निर्देश
नवी दिल्ली : अलीकडच्या काळात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत असली तरी देशभरात वेगाने होणाऱ्या लसीकरणाचा हा परिणाम आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभरात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत मात्र देशातील आरोग्य तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची संभाव्य भिती व्यक्त केली असल्याने लसीकरणाचा वेग जरी वाढला असला, तरी तिसऱ्या लाटेला टाळायचे असेल, तर पुढील तीन महिने नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. आज दुपारी दिल्लीत झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये हा इशारा देण्यात आला आहे.
या बाबत केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे कि , देशातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले आणि लसीकरणाचा वेग देखील वाढलेला असला, तरी कोरोनाचे संकट आणि त्याने उभी केलेले आव्हाने अजून देखील संपलेली नाहीत. या संकटाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे आवश्यक असल्याची गरज आहे. सध्याच्या काळातही दिवसाला कोरोनाचे सरासरी २० हजार नवे बाधित आढळत आहेत. गेल्या आठवड्यात यापैकी ५६ टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये सापडले आहेत.
दरम्यान, पुढील तीन महिन्यात विविध प्रकारचे सण असून या काळामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे. “ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात आपण अधिक सतर्क राहायला हवे . गर्दीची ठिकाणे किंवा विनाकारण प्रवास करणे आपण टाळायला हवे . घरी राहून व्हर्च्युअल पद्धतीने सण-उत्सव साजरे करावेत, ऑनलाईन शॉपिंग करावी”, असेही आवाहन लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.
'Please watch your October, November, December,' official warns people about threat of Covid resurgence during festival, wedding season
— Press Trust of India (@PTI_News) October 7, 2021
सध्या देशात आत्तापर्यंत ७१ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला असून २७ टक्के नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. देशातील करोनाच्या आजच्या आकडेवारीनुसार २४ तासात २२ हजार ४३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तींचा आखडा ३ कोटी ३८ लाख ९४ हजार ३१२ इतका झाला आहे. यापैकी आजघडीला २ लाख ४४ हजार १९८ अॅक्टिव रुग्ण आहेत. हे प्रमाण गेल्या ७ महिन्यांत सर्वात कमी आहे. याशिवाय आज सलग १३व्या दिवशी दिवसभरात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजारांच्या खाली राहिला आहे.