EducationNewsUpdate : अतिवृष्टीमुळे सीईटी प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या विद्यार्थ्यांना सीईटी प्रवेश परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि , या नैसर्गिक आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देवू न शकल्याचे विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविले आहेत. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यामुळे, अतिवृष्टी, डेंगू, मलेरीया, टायफाईड इ. साथीचे आजार, ट्राफिक, रोड दुर्घटना इ. मुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचण निर्माण झाली असेल किंवा एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे, परीक्षेचे पहिले सत्र ३० मिनिटाच्या आत तांत्रिक अडचण निर्माण झाली असेल किंवा परीक्षेला प्रत्यक्ष हजर असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पुर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत. या कारणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता तसेच उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पीसीएम ग्रुप करीता जवळपास २७ ते ३० हजार उमेदवारांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करुन परीक्षा देवू शकले नाहीत, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्यासाठी अंतिम संधी देण्यात देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना सामंत पुढे म्हणाले कि , वरील कारणांचा विचार करता पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या उमेदवारांना दिनांक १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वरील कारणांना अनुसरुन पात्र उमेदवारांना ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्क यापूर्वी भरली असल्यामुळे त्यांची निशुल्क नोंदणी करुन घेण्यात येईल. तसेच नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करुन देऊन दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२१ रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्याचे येणार आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालक यांनी काळजी करू नये, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.