MaharashtraRainUpdate : ‘गुलाब’ नंतर आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘शाहीन’ वादळाचाही घटक
मुंबई : आधीच बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश ओरिसासह महाराष्ट्रालाही अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना आता एक संकट महाराष्ट्राकडे झेप घेऊ बघत आहे. गुलाबनंतर आता ‘शाहीन’ नावाचे चक्रीवादळ येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या भागांना धडक देणार अशा इशाराआयएमडीने दिला आहे.
दरम्यान अरबी समुद्रात हे वादळ तयार होणार आहे. या चक्रीवादळाला ‘शाहीन’ असे नाव देण्यात आले आहे. हे नाव ओमान देशाने दिले आहे. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दोन दिवसात छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत पोहोचणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार हे वादळ ३० सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचणार असून इथे आल्यावर हे वादळ आपले स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. या वादळाच्या हालचालींवर आयएमडीचे सतत लक्ष असल्याचे म्हटले आहे.
गुलाब चक्रिवादळाचे आता राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48तास राज्यावर दिसतील. येत्या 24तासात,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे पण.विदर्भात प्रभाव कमी. उद्या उ कोकण व उ मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील
-IMD pic.twitter.com/sb2syKG56i— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 28, 2021
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शाहीन हे चक्रीवादळ गुलाबपेक्षा भयंकर आणि तीव्र असणार आहे. मात्र हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिमी तटांवर न धडकता समुद्रातुनच ओमानच्या दिशेने निघून जाणार आहे. मात्र याचा प्रभाव महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये पडणार आहे. यामुळे राज्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ वादळाने फक्त ओडिशा आणि आंध्रप्रदेशमधेच नाहीतर छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधेही हाहाकार माजवला आहे. सध्या राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. इतकेच नाही तर दहा लोकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे.
हवामान खात्याने आजही पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे. तर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली ही तीन जिल्हे वगळता उर्वरित राज्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.