MaharashtraPoliticalUpdate : महापालिका निवडणुकीतील तीन प्रभागावरून काँग्रेस करणार आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन
नागपूर : राज्य सरकारने आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकशाही पद्धतीने जाऊन या निर्णयाला विरोध करू’ असे म्हणत स्वतःच्या सरकारविरुद्धच दंड थोपटले आहेत. तसेच, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार नाही, असेही पटोलेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार केले जातील, असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. परंतु, महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत, यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी थेट स्वतःच्याच सरकारविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आता मुख्यमंत्र्यांना बोलणार नाही
याबाबत बोलताना पटोले यांनी म्हटले आहे कि , ‘आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधीच्या भावना मांडलेल्या होत्या. महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या भावना मांडल्या होत्या आणि त्या आधारे दोन सदस्यीय प्रभाग सदस्य करावे, असं सरकारला कळवले होते. आता सरकारने जे निर्णय घेतलेला आहे, त्याला आम्ही लोकशाही पद्धतीने लोकांसमोर जाऊन विरोध करू. तसेच, ‘आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळे असतात. आम्ही संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करू, असेही पटोले म्हणाले.
विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा
दरम्यान आमचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे जो काही अहवाल देतील त्याप्रमाणे आशिष देशमुख प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल. मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आशिष देशमुख यांच्या वक्तव्यात संदर्भात काही माहिती समोर आली आहे. आता प्रभारीच्या अहवालानंतर निर्णय होईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. विदर्भात सर्वत्र फिरताना परिस्थिती पाहिली आहे. मराठवाड्याची माहिती घेतली आहे. सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. निर्माण झालेली परिस्थिती ओला दुष्काळ झाल्याकडे संकेत देत आहेत. सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत करावी ही काँग्रेसची मागणी आहे, असंही पटोले म्हणाले.