अभियंता दिन विशेष : अभियंते म्हणजे देशाच्या नव निर्मितीचे शिल्पकार !!
आज १५ सप्टेंबर ! ज्या दिवशी भारतात अभियंता दिन म्हणून साजरा करतात . त्याचे कारण आहे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया. खरे तर कुठल्याही देशाचे भौतिक नवनिर्माण होते ते त्या त्या देशातील अभियंत्यांमुळे. मग ते अभियंते कुठल्याही शाखेचे असोत. मानवाच्या प्रगतीचे दुसरे नाव कुठले असेल तर ते अभियंत्याचे आहे. म्हणूनच आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे असे आपल्या पालकांना वाटते. कोणत्याही देशाची समृद्धी त्या त्या देशातील अभियंत्यांवर आहे. स्थापत्य शैलीला अनादिकालापासून महत्व आहे. भारतातील उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना त्याचेच द्योतक आहे . याच मालिकेत सर विश्वेश्वरैया भारतीय स्थापत्य शैलीचे जनक आहेत .
अलीकडच्या काळात आधुनिक शिक्षण व्यवस्थेने प्रत्येक क्षेत्रात गरजेपेक्षा अधिक पदवीधरांची निर्मिती केली परंतु त्या तुलनेने कामाच्या संधी निर्माण केल्या गेल्या नाही. पर्यायाने शिक्षणासाठी शिक्षण म्हणून देशात बहुसंख्य अभियंते निर्माण झाले म्हणून आजच्या काळात या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. तरीही अशा परिस्थितीतही अनेक अभियंता जागतिक स्तरावर आपला नाव लौकिक करीत आहेत. भारतात आकाशला गावांनी घालणाऱ्या उत्तुंग इमारती , जागतिक दर्जाचे भव्य रस्ते निर्माण केले जात आहेत. हि देशवासियांसाठी नक्कीच भूषणावह बाब आहे.
जाणून घेऊयात अभियंता दिनाविषयी….
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म कर्नाटक राज्यातील मैसूर , कोलार जिल्ह्यात १५ सप्टेंबर १८६१ रोजी एका तेलुगु कुटुंबात झाला होता. मोक्षगुंडम यांच्या वडीलांचे नाव श्रीनिवास शास्त्री तर आईचे नाव वेंकाचम्मा असे होते. त्यांचे वडील संस्कृत विषयाचे तज्ज्ञ होते. विश्वेश्वरैया यांनी आपल्या जन्मगावीच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण बंगळुरू येथील सेंट्रल कॉलेजमध्ये पूर्ण केले मात्र आर्थिक टंचाईमुळे त्यांना विद्यार्थी दशेतच मोठा संघर्ष करावा लागला. तरीही ते डगमगले नाही. शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी त्यांनी खासगी शिकवणी घेत आपले शिक्षण पूर्ण केले. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया १८८१ मध्ये ते बीए परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांची हि गुणवत्ता लक्षात घेऊन पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मैसूर सरकारने उचलली. त्यामुळे त्यांनी पुणे येथील सायन्स कॉलेजमधून अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. इथेही ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे गुण आणि कौशल्य पाहून सरकारने त्यांना नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर सेवेत दाखल करुन घेतले.
विश्वैश्वरय्या यांच्या कार्याचा अमर ठेवा
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात पुणे जिल्ह्यातील खडकवासला , म्हैसूरमधील कृष्ण सागर , ग्वाल्हेरमधील तिग्रा धरण, भद्रावती आयर्न अँण्ड स्टील वर्क्स, मैसूर सैंडल ऑयल अँण्ड सोप फॅक्ट्री, मैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणे ही विश्वैश्वरय्या यांच्या कार्याचा अमर ठेवा आहे. त्यांचे कार्य पाहून त्यांना कर्नाटकच्या विकासाचा भगीरथ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. एवढेच नाही तर त्यांच्या कार्याची ख्याती ऐकून निजामाने त्यांना हैदराबादेत विशेष निमंत्रथीत केले होते त्यामुळे हैदराबाद शहर बनवण्याचे संपूर्ण श्रेय डॉ विश्वेश्वरय्या यांना जाते. त्यांनी तेथे पूर संरक्षण प्रणालीची रचना केली, त्यानंतर ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. विशाखापट्टणम बंदराचे समुद्री कटाव होण्यापासून संरक्षण करण्यासाठी एक यंत्रणा विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी म्हैसूर सरकारसोबत अनेक कारखाने आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या.
अनेक देशात साजरा केला जातो अभियंता दिन
अभियंता दिन केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. उदाहरणार्थ, १६ जून रोजी अर्जेंटिनामध्ये, ७ मे रोजी बांगलादेशात, १५ जून रोजी इटलीमध्ये, ५ डिसेंबर रोजी तुर्कीमध्ये, २४ फेब्रुवारीला इराणमध्ये, २० मार्च रोजी बेल्जियममध्ये आणि १४ सप्टेंबर रोजी रोमानियामध्ये अभियंता दिन म्हणून जातो. वास्तविक, हा दिवस जगभरातील अभियंत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो, जेणेकरून ते त्यांच्या कौशल्यांमुळे देश आणि जगाला प्रगतीच्या नवीन मार्गावर नेतील. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे नवनिर्माते होते. त्यांच्या अलौकिक कार्यानेच देशाला नवे रूप आणि नाव दिले. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्यांच्या स्मरणाच्या निमित्ताने सर्व अभियंत्यांना अभियंता दिला हार्दिक शुभेच्छा.
विश्वैश्वरय्या यांच्याबद्दल सांगितला जाणारा किस्सा
स्वतंत्र्यपूर्व भारतातील हा किस्सा आहे. एकदा विश्वैश्वरय्या हे इंग्रज अधिकाऱ्यांसोबत ट्रेनमधून प्रवास करत होते. ट्रेनमधील इतर प्रवासी त्यांची खिल्ली उडवत होते. विश्वैश्वरय्या यांचा पोशाख आणि दिसण्यावरुन ते खिल्ली उडवत होते. दरम्यान, विश्वैश्वरय्या यांनी ट्रेनची साखळी अचानक खेचली. ट्रेन तत्काळ थांबली. ट्रेनमधील इतर प्रवासी विश्वैश्वरय्या यांना बोल लाऊ लागले. ट्रेनमधील पोलीस विश्वैश्वरय्या यांना विचारते झाले. साखळी का खेचली. मग विश्वैश्वरय्या यांनी सांगितले की, इथून पुढे साधारण एक किलोमीटर अंतरावर रुळ तुटला आहे. त्यामुळे मी साखळी खेचली. सुरुवातील त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पुढे जाऊन खरोखरच खात्री करुन घेतली असता रुळ तुटलेल्या आवस्थेत आढळला. यावर सर्वांनीच आश्चर्याने विचारले की, आपल्याला हे कसे कळले. यावर विश्वैश्वरय्या म्हणाले की, मी पेशाने अभियंता आहे. त्यानंतर विश्वैश्वरय्या जे प्रसिद्ध झाले. ते आज तागायत त्यांच्या कार्याचे जगभर कौतुक केले जाते.