MaharashtraNewsUpdate : हृदयद्रावक : रस्त्याअभावी पत्नीला वाचवण्यासाठी पतीने स्वतःच्या खांद्यावर नेले पण “ती ” वाचू शकली नाही !!
नंदुरबार : एकीकडे मोठ्या शहरात महागड्या गाड्या आणि श्रीमंत लोकांसाठी रस्ते चकाचक केले जातात मात्र आदिवासी भागात लोकांना जगण्या मरण्याइतक्याही सुविधा सरकारकडून मिळत नसल्याचा प्रत्यय नुकताच आला आहे . त्याचे असे झाले कि , एका महिलेला आपला पत्नीला उपचारांसाठी नेत असतानाच घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला. पतीने प्रयत्नांची पराकाष्टा करीत पत्नीला खांद्यावर उचलून उपचारांसाठी पायी नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळेत उपचारांअभावी पत्नीने घाटातच जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना नंदुरबार जिल्ह्यातील चांदसौली येथे घडली.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगरात असलेल्या धडगाव तालुक्यातील चांदसौली येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. परिणामी, परिसरातील घाट रस्ता बंद झाला आणि नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी पायी मार्गच शिल्लक राहिला. येथील सिदलीबाई पाडवी या महिलेच्या पोटात दुखत असल्याने नातेवाईक तिला उपचारांसाठी घेऊन जात असतानाच दरड कोसळली. रस्ताच नसल्याने शेवटी पतीने त्यांना खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली. मात्र, सिदलीबाई यांनी पतीच्या खांद्यावरच जीव सोडला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली असून घाटातील रस्ता दुरुस्तीचे कामही सुरु करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी करतात. दरवर्षी या घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होतो आणि हजारो आदिवासी बांधवांना या समस्येचा सामना करावा लागतो असा अनुभव असला तरी या भागातील रस्ते कायमस्वरूपी दुरुस्त केले जात नाहीत.
या घटनेची केंद्रीय मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली असून याबाबत जिल्हा प्रशासनाला चौकशी अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले आहे. या भागात १३२ केव्ही विद्युत लाइन जात असल्याने घाटात ब्लास्टिंग करण्यात येत आहे. त्यामुळे दरड कोसळत असल्यामुळे रस्ता बंद पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.