MumbaiNewsUpdate : सायराबानू उपचारासाठी रुग्णालयात दाखल , सायरा बानू यांच्या बातमीने धर्मेंद्र चिंतीत
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांची तब्येत खालावल्याने मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पत्नी म्हणून सायरा बानू यांनी दिलीपकुमार यांना अखेरपर्यंत खंबीरपणे साथ दिली. दरम्यान दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर आता सायरा बानू यांचीही प्रकृती बिघडली आहे. ही बातमी कळताच सायरा बानू लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत
उपचारासाठी सायरा बानू मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर दोन महिन्यांतच सायरा यांची तब्येत बिघडली. गेल्या तीन दिवसांपासून ब्लड प्रेशरचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्यत स्थिर आहे. पण रक्तदाब अजून नॉर्मल झालेला नाही. श्वास घ्यायला अडचण येत आहे. त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतरच नेमका कुठला त्रास होतोय हे सांगता येईल.
गेल्या ५४ वर्षांपासून सायरा बानू दिलीप कुमार यांची पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या . दोनच महिन्यांपूर्वी ७ जुलैला दिलीप कुमार यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. सायरा बानू ७६ वर्षांच्या आहेत. त्या दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होत्या.पती दिलीप कुमार यांच्या देहावसानानंतर सायरा बानू एकांतातच होत्या, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. गेल्या आठवड्यापासून त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी जास्त सुरू झाल्या होत्या.
सायरा बानू यांच्या बातमीने धर्मेंद्र चिंतीत
दरम्यान सिने अभिनेते धर्मेंद्र आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यां दोघांमधील घट्ट मैत्रीचं नातं जगजाहीर आहे. एका माध्यमाशी बोलताना अभिनेते धर्मेंद्र यांनी सायरा बानू यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे. चार दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांचं सायरा बानू यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. धर्मेंद्र यांनी चार दिवसांपूर्वी सायरा बानू यांना फोन केला होता. पण तो कॉल उचलला गेला नाही. त्यानंतर फोनवर मिस्ड कॉलपाहून सायरा बानू यांनी धर्मेंद्र यांना पुन्हा कॉल बॅक केला होता.
सायरा बानू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळाल्यानंतर आता त्यांची प्रकृती कशी आहे, याची चौकशी करण्यासाठी ते कॉल करणार आहेत. तसेच सायरा बानू लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी याव्यात यासाठी देवाकडे प्रार्थना करणार असल्याचं देखील धर्मेद्र यांनी सांगितलं.
याविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, “मी त्यांना जेंव्हा ४ दिवसांपूर्वी फोन लावला होता परंतु त्या माझा पहिला कॉल उचलू शकल्या नाहीत, पण थोड्या वेळाने त्यांनी मला परत कॉल बॅक केला होता…त्यावेळी त्यांची तब्बेत ठीक नसल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं.” यापुढे बोलताना धर्मेंद्र म्हणाले, “त्यावेळी सायरा बानू यांच्यासोबत जास्त बोलणं होऊ शकलं नाही. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानू यांच्यासाठी खूपच कठीण काळ होता. सारं काळ रिकामं असल्यासारखं त्यांना वाटत असणार आणि हे आपण सर्वच जण समजू शकतो.”