MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठा निर्णय, लसीकरणावर अधिक भर
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरू करण्यात येत आहे. दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल आणि धार्मिक स्थळांबाबत मात्र कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी उद्या टास्क फोर्सची बैठक बोलावली असून या मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या संदर्भात निर्णय जाहीर केला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. उद्या टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यातील करोना स्थितीची आढावा घेतल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता देण्याचा विचार केला जाणार असून त्यानंतर धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, यात ८ ते १० दिवस जातील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आली असली, तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांमध्ये आजही काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावरून या जिल्ह्यांमध्ये शिथिल मिळणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असताना दिले आहेत. तसेच उद्यापासून काही ठिकाणी शिथिलता देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान करोनाचा संसर्ग थोपवायचा असेल तर कोरोनाविषयक नियम हे पाळावेच लागतील. जो पर्यंत ठराविक टप्प्यापर्यंत लसीकरण होत नाही, तो पर्यंत नियम पाळावे लागणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.