MumbaiNewsUpdate : अनिल देशमुख यांच्या विरोधात जयश्री पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट
मुंबई : हॉटेल व्यावसायिकांकडून १०० कोटी वसुलीच्या आरोपावरून ईडी आणि न्यायालयाच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. जयश्री पाटील यांच्या याचिकेमुळेच देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावे लागत आहे.
दरम्यान ईडीची पिडा टळावी यासाठी अनिल देशमुख उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयात धावाधाव करत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्या जयश्री पाटील आता पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या धावपळीला ब्रेक लावण्यासाठी मैदानात उतरल्या असल्याचे वृत्त आहे.
गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली. तपास हा योग्य होत आहे, असे निरीक्षण नोंदविल्यानंतर राज्य सरकार किंवा अनिल देशमुख सदर भ्रष्टाचार प्रकरण तपास थांबावा म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतील. त्यापूर्वीच त्यांना कोणताही दिलासा सुप्रीम कोर्टाकडून मिळू नये म्हणून जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा देशमुख यांना कोणताही मार्ग मिळू नये, असा प्रयत्न जयश्री पाटील यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आता जयश्री पाटील आणि अनिल देशमुख यांचा संघर्ष पाहण्यास मिळणार आहे.