MumbaiNewsUpdate : ट्रॅजेडी किंग अभिनयाचा बादशहा दिलीपकुमार यांची “एक्झिट”

मुंबई : आज पहाटेच्या सुमारास बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग अभिनयाचा बादशहा म्हणून ख्याती असलेले दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. आज मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत दिलीप कुमार यांच्यांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद , पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसनेते राहुल गांधी , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेते तुषार कपूर, अजय देवगण, अक्षयकुमार, राजनाथ सिंग आदींनी शोक व्यक्त करून आपली आदरांजली अर्पण केली आहे.
दिलीप कुमार यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते . यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल केले होते. दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते. दरम्यानच्या काळात दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीला अराम पडावा म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते . आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांचे निधन झाल्याने संबंध सिनेजगतावर शोककळा पसरली आहे.
दिलीप कुमार यांनी पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये त्यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतो. १९४४ मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. त्यानंतर ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पुढे त्यांच्या यशाची कमान अखेरपर्यंत चढतीच राहिली. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून सिनेसृष्टीत ओळखले जात होते. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. अशा या दमदार अभिनेत्याला महानायक ओन्लाईनची भावपूर्ण आदरांजली.
दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर पाकिस्तान येथे झाला होता . दिलीप कुमार सायरा बानो या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत १९६६ मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यावेळी दिलीपकुमार ४४ तर सायराबानो २२ वर्षांच्या होत्या. २००० पर्यंत ते राज्यसभेवर खासदार होते. १९८० मध्ये त्यांना मुंबईचा शरीफ हा पुरस्कार देण्यात आला तर १९९५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९८ मध्ये पाकिस्ताननेही त्यांच्या अभिनयाची दखल घेत निशान-ए-इम्तियाज़ हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
दिलीप कुमार यांची ‘ट्रॅजेडी किंग’ अशी विशेष ओळख होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी ‘शहीद’, ‘मेला’, ‘अंदाज’, ‘जोगन’, ‘बाबुल’, ‘डाग’, ‘आन’, ‘आझाद’, ‘नया दौर’, ‘मधुमती’, ‘पैगाम’, ‘कोहिनूर’, ‘गंगा जमुना’, ‘राम और श्याम’, ‘आदमी’, ‘गोपी’, ‘क्रांती’, ‘शक्ती’, ‘विधाता’, ‘कर्मा’ आणि ‘सौदागर’ सारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत.
With a heavy heart and profound grief, I announce the passing away of our beloved Dilip Saab, few minutes ago.
We are from God and to Him we return. – Faisal Farooqui
— Dilip Kumar (@TheDilipKumar) July 7, 2021