औरंगाबाद : उद्या १७ जूनपासून जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांसह महत्त्वाची पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. यामुळे गेल्या दीड वर्षापासून शुकशुकाट असलेल्या या पर्यटन स्थळांना आता पर्यटकांना भेटी देता येणार आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीसह औरंगाबाद लेणी , दौलताबादचा किल्ला पर्यटकांसाठी बंद होता. दरम्यान अनलॉक महाराष्ट्र अंतर्गत औरंगाबादचा क्रमांक पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात आल्याने तसेच कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चालल्याने जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद जिल्हा आणि ग्रामीण भागातील निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १७ जूनच्या सकाळी ६ वाजेपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरूळ, बिबीका मकबरा, दौलताबाद किल्ला ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केला आहे.
सुधारित आदेशानुसार या पर्यटनस्थळांवर सकाळच्या सत्रात १००० आणि दुपारच्या सत्रात १००० पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांना या ठिकाणी भेट देत असताना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. पर्यटन स्थळे खुली करण्यात आली असली तरी धार्मिक स्थळे मात्र तूर्तास बंदच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.