Good News : यंदा समाधानकारक पाऊस, १ जूनपर्यंत मान्सून केरळ किनारपट्टीवर !!
नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोनाच्या चर्चेने विचलित झालेला असताना देशासाठी पावसाची आनंदाची बातमी असून अंदमानहून केरळच्या दिशेने पोहोचलेला मान्सून देशात पुढच्या तीन दिवसांमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून 1 जूनला किंवा कदाचित 31 मेलाच मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे.
या वृत्तानुसार सध्या केरळच्या किनारपट्टीपासून अंदाजे 200 किलोमीटर अंतरावर मान्सून असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तौक्ते आणि त्यांनंतर आलेल्या यास चक्रीवादळामुळे केरळमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले होते पण या चक्रीवादळांमुळे मान्सून दोन तीन दिवस आणखी आधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण आता मान्सून 31 मे किंवा 1 जून दरम्यानच दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनचा वेग दरवर्षीप्रमाणेच सामान्य आहे. त्यामुळे सध्या तो केरळच्या दिशेने प्रवास करत आहे. गुरुवारी मालदीव ओलांडून मान्सून पुढे सरकला आहे. त्यामुळे लवकरच आता देशात मान्सूनच्या सरी बरसतील.
दरम्यान यंदा देशात आणि राज्यात मान्सूनचे वेळेत आगमन होणार असल्याने समाधानकारक असा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात तळकोकणामध्ये आणि मुंबईत 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. तर तर 15 ते 20 जून दरम्यान मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागानं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 98 टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळं नागरिक, प्रशासन, सरकार सगळेच हैराण झाले आहेत. मात्र या संकटाच्या काळातही संपूर्ण देशाची घडी देशातल्या शेतकऱ्यामुळं काहीशी चांगली राहिली आहे. त्यामुळं जर शेतकरी सुखात राहिला तर अशा मोठ्या संकटावरही आपण मात करू शकतो.