फेसबुक आणि गुगलने दर्शवली नियम लागू करण्याची तयारी
फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जारी केली होती. सरकारने प्लॅटफॉर्म्सला नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी २५ मे पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या कालावधीत Koo व्यतिरिक्त एकाही प्लॅटफॉर्मने याची अंमलबजावणी केली नाही. मात्र, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने कंपनी लवकरच हे नवीन नियम लागू करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनी सरकारसोबत काही मुद्यांवर चर्चा करत आहे. तर यासंदर्भात गुगलचे देखील निवेदन समोर आले आहे.
अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावर फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, आयटी नियमांनुसार आम्ही ऑपरेशन प्रोसेस लागू करणे व कार्यक्षमतेत सुधारणांवर काम करत आहोत. मात्र, फेसबुक यूजर्सला स्वतंत्र आणि सुरक्षिरित्या स्वतःला व्यक्त करण्यासाठी सूट देण्यास कटिबद्ध आहे. दरम्यान, गूगलचे प्रवक्ता यासंदर्भात म्हणाले की, कंपनी भारताच्या वैधानिक प्रक्रियेचा पूर्णपणे सन्मान करते. कंपनीला आपल्या यूजर्सला पूर्ण सुरक्षा द्यायची आहे. कंपनी नवीन नियमांतर्गत काम करत राहील. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असेल यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. तसेच, नवीन नियमांतर्गत कॉन्टेंट मॅनेज करण्यास काही वेळ लागेल, असेही म्हटले आहे. नवीन नियमांचे पालन करणार असल्याचा कंपनीने विश्वास दिला आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारे फसवणूक अथवा फेक कॉन्टेंट जे नवीन नियमांचे उल्लंघन करेल, ते हटवण्यासंदर्भात काम करणार आहे.
आयटी मंत्रालयाने फेब्रुवारीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन नियम जारी केले होते. त्या नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला एक मासिक हवाल जारी करावा लागेल, ज्यात तक्रार आणि त्यांच्या निवारणाबद्दल माहिती असेल. सोबत कोणत्या पोस्ट आणि कॉन्टेंटला हटवले व याचे कारण काय होते, याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल. तसेच, सर्वोत प्रथम पोस्ट अथवा मेसेज कोणी केला आहे, याची माहिती देखील द्यावी लागेल. मात्र, अद्याप कंपन्यांनी या नियमांची अंमलबजावणी केलेली नाही.