CoronaIndiaNewsUpdate : सावध राहा : देशात तीन लाखाहून अधिक रुग्ण, देशात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा हाहाकार सुरु असून आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना विषाणूच्या आकडेवारीने अक्षरशः कळस गाठला आहे. गुरुवारी देशात 3.3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) सलग दुसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या वर गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाला घरात बंद होण्याची वेळ येत आहे. तर 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 17 दिवसांपासून देशात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या आढळत आहे. दुसरीकडे, देशात मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या 10 दिवसांपासून दररोज 1 हजाराहून अधिक कोविड रुग्णांचा मृत्यू होत आहेत . गेल्या 10 दिवसांत 15 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत बिकट परिस्थिती
दिल्लीच्या तीन महानगरपालिकांने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत तब्बल 1,057 लोकांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत . या आकडेवारीनुसार दिल्लीत 18 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान दररोज अंदाजे 352 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन महानगरपालिकांच्या 9 क्षेत्रांत 21 स्मशानभूमी आणि कब्रस्तान आहेत. नगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, 18 एप्रिल रोजी 290 अंत्यसंस्कार (372 अंत्यसंस्कार आणि 17 दफन), 19 एप्रिल रोजी 357 अंत्यसंस्कार (334 अंत्यसंस्कार आणि 23 दफन) आणि 20 एप्रिल रोजी 410 अंतिम संस्कार (391 अंत्यसंस्कार आणि 19 दफन) केले गेले आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाची स्थिती हाताबाहेर
दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 67,013 नवीन रुग्ण आढळली आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ उत्तर प्रदेशात 34 हजार 379, केरळमध्ये 26 हजार 995, दिल्लीत 26 हजार 169 आणि कर्नाटकात 25 हजार 795 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. छत्तीसगडमध्ये 16 हजार 750 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. तर राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि आंध्र प्रदेश याठिकाणीही 10 हजार ते 15 हजार दरम्यान कोरोना रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात गुरुवारी एकूण 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यात ऑक्सिजन बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. बहुतांशी रुग्ण आरोग्याच्या सुविधा न मिळाल्याने मृत्यूमुखी पडत आहेत. महाराष्ट्राबरोबरच देशाची राजधानी दिल्लीत 306 आणि छत्तीसगडमध्ये 207 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात 195, गुजरातमधील 137 आणि कर्नाटकमध्ये 123 रुग्णांचा बळी गेला आहे. या राज्यांव्यतिरिक्त पंजाब, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल आणि हरियाणामध्ये 50 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.