Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सुधारित बातमी : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २२ जवान शहीद

Spread the love

जगदलपूरः छत्तीसगडमधील बस्तरच्या बीजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद तर ३१ जवान जखमी झाले.  या चकमकीत अजूनही  काही बेपत्ता आहेत. बीजापूरच्या तर्रेम भागातील जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवाद्यांनी जवळपास ७०० जवानांना घेरले  होते. ३ तास ही चकमक चालली. या चकमकीत ९ नक्षलवादीही ठार झाले.  दरम्यान, घटनस्थळी आणखी १४ मृतदेह आढळून आले असून या चकमकीत २२ जवान शाहिद झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान या हल्ल्याचा देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला असून शहिदांना आदरांजली व्यक्त केली आहे.

छत्तीसगडमध्ये १० दिवसातील हा दुसरा नक्षलवादी हल्ला आहे. यापूर्वी २३ मार्चला नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून जवानांची बस उडली होती. त्यात ५ जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांनी IED चा स्फोट केला होता.

नक्षलवाद्यांनी सरकारसमोर १७ मार्चला शांततेचा प्रस्ताव ठेवला होता. जनतेच्या भल्यासाठी छत्तीसगड सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहोत, असे  म्हणत नक्षलवाद्यांनी चर्चेसाठी तीन अटी ठेवल्या होत्या. सशस्त्र दलांना हटवणे , नक्षलवादी संघटनांवरील बंदी हटवणे  आणि तुरुंगात असलेल्या नेत्यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली होती.

७०० जवानांना घेरले 

वास्तविक पाहता जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर शुक्रवारी रात्री CRPFचे कोब्रा कमांडो, CRPF बस्तरिया बटालियन आणि स्पेशल टास्क फोर्सच्या दोन हजार जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती. पण नक्षलवाद्यांनी ७०० जवानांना घेरत तीन बाजूंनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला होता. घटनास्थळी १८० नक्षलवाद्यांशिवाय कोंटा एरिया कमेटी, पामेड एरिया कमेटी, जगरगुंडा एरिटा कमेटी आणि साबागुडा एरिया कमेटीचे जवळपास २५० नक्षलवादीही होते. नक्षलवादी दोन ट्रॅक्टरमध्ये मृतदेह घेऊन गेल्याची माहिती आहे, असे  पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले.

बीजापूर-सुकम जिल्ह्याच्या सीमाभागात असलेला जोनागुडा डोंगराळ भाग हे नक्षलवाद्यांचे मुख्य ठिकाण आहे. इथे नक्षलवाद्यांची संपूर्ण एक बटालियन आणि अनेक प्लाटून कायम तैनात असतात. या संपूर्ण भागाचे  नेतृत्व नक्षलवादी सुजाता हिच्या हातात आहे. नक्षलवादी जवानांवर मोठा हल्ला करणार अशी शंका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आधीच होती. यामुळेच संपूर्ण भागात नक्षलवाद्यांविरोधात कारवाईसाठी २ हजारांहून अधिक जवानांना उतरवण्यात आले  होते . जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख उत्तर देत त्यांचा वेढा तोडला आणि तीनहून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आणि  जखमी जवान व  शहीद जवानांचे मृतदेह ही बाहेर काढण्यात आले. शहीद जवानांमध्ये २-२ बस्तरिया बटालियन आणि डीआरजी आणि एक कोब्रामधील आहे.

अमित शहा यांचा नक्षलवाद्यांना गंभीर इशारा

या हल्ल्याची माहिती मिळताच  सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह हे छत्तीसगडमध्ये दाखल झाले असून  ते संपूर्ण स्थितीचा आढावा घेत आहेत. बीजापूरमधील घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना छत्तीसगडला जाण्याच्या सूचना दिल्या. गृहमंत्री अमित शहा यांनी महासंचालकांना बीजापूरला जाण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच गृहमंत्री छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून नक्षलवादी हल्ल्यात शूर जवानांनी बलिदानाची आहुती दिली. त्यांचे  बलिदान हा देश विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आपल्या सहवेदना आहेत. आम्ही शत्रूच्या  विरोधात कारवाई सुरूच ठेवू, असा गंभीर इशारा अमित शहांनी नक्षलवाद्यांना दिला आहे.

दरम्यान नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या ७ जवानांची  प्रकृती आता चांगली असून  बेपत्ता जवानांसाठी  शोध मोहीम सुरू आहे. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला आहे. सीआरपीएफचे डीजीही छत्तीसगडमध्ये आहेत. मी आज संध्याकाळी छत्तीसगडला रवाना होतोय, अशी माहीती मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली. ते सध्या गुवाहाटीमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!