CoronaNewsUpdate : हिंगोली जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी
औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना लागून असलेल्या मराठवाड्यातील हिंगोली या जिल्ह्यातही संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात आज आणि उद्या असे दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. औरंगाबादेतही कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारच्या वर गेला असून कोरोना आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान हिंगोली जिल्ह्यात अजूनही करोनाची स्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सध्या २९१ रुग्ण उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात १६ नवीन रुग्ण आढळून आले. मात्र, शेजारच्या यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात १ ते सात मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज यााबाबत आदेश जारी केले. जिल्ह्यात कठोरपणे संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार असून संचारबंदी दरम्यान सात दिवस केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दूध विक्रीला वेळेचे बंधन असेल, पेट्रोल पंप बंद राहतील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकारचे व्यवहार व बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. बंदी आदेश मोडून कुणी फिरताना आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही बजावण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यात २२ फेब्रुवारी १ मार्च असा लॉकडाऊन लावण्यात आला असून याबाबत आज नवीन आदेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्यात १ मार्चनंतर ७ दिवसांसाठी संचारबंदी कायम राहणार आहे तर अमरावती शहर व अचलपूर शहरात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंजनगाव सुर्जी हे शहरच कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून तिथे याअनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू असणार आहेत. अमरावती जिल्हा विदर्भातील करोनाचा नवा हॉटस्पॉट ठरला असून दररोज मोठ्या संख्येने नवीन रुग्णांची भर जिल्ह्यात पडत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरावती महापालिका हद्दीत आज करोनाचे ४२३ नवीन रुग्ण आढळले तर उर्वरित जिल्ह्यात १२२ नवीन रुग्णांची भर पडली.